✍️राळेगाव : प्रतिनिधी ( किशोर वाघ )
राळेगाव शहरात महाराष्ट्र शासनाच्या सुमारे १३ अंगणवाडी केंद्रे कार्यरत असून, त्यापैकी अनेक केंद्रांची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याचे वास्तव समोर आले आहे. अनेक केंद्रांना रंगरंगोटी नाही, दरवाजे-खिडक्यांची तावदाने तुटलेली आहेत, काही ठिकाणी कंपाउंड वॉलही मोडकळीस आलेली आहे. त्यामुळे बालकांच्या सुरक्षिततेसह शिक्षण व पोषण व्यवस्थेवरही गंभीर परिणाम होत आहे.
या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधत अंगणवाडी केंद्रांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, मोडकळीस आलेल्या इमारतींचे तातडीने पुनर्बांधकाम करण्यात यावे, तसेच प्रत्येक केंद्रात स्वतंत्र स्वयंपाकगृह (किचन) व शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गिरीश पारेकर यांना निवेदन देण्यात आले.

निवेदन सादर करताना शहरप्रमुख शंकर गायधने, महिला आघाडीच्या शहर संघटिका पार्वता मुखरे, उपशहरप्रमुख देवराव नाखले, योगेश मलोंढे, श्रीकांत कोदाणे, सुनील क्षिरसागर, रोशन उताणे, रवी मेश्राम, निशी मोहन पोंगडे, वैभव दुधे, शेतकरी सेनेचे धनराजजी श्रीरामे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
शहरातील अनेक अंगणवाडी केंद्रांमध्ये स्वतंत्र किचनची सोय नसल्याने पोषण आहार वितरणात अडचणी येत आहेत. तसेच शौचालय सुविधा नसल्यामुळे केंद्रातील महिला कर्मचारी आणि लाभार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रभाग क्रमांक १० मधील एक अंगणवाडी केंद्र तर अत्यंत धोकादायक अवस्थेत असून ते बालकांसाठी जीवघेणे ठरत असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले.
मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असल्यामुळे पालकांचा कल बालकांना कॉन्व्हेंट शाळांकडे पाठविण्याकडे वाढत आहे. त्यामुळे शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाची भूमिका संशयास्पद ठरत असून, नगरपंचायतीकडूनही गेल्या आठ-नऊ वर्षांपासून अंगणवाडी केंद्रांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात आला. यापूर्वीही शिवसेनेने अंगणवाडी केंद्रातून दिल्या जाणाऱ्या निकृष्ट आहाराविरोधात आवाज उठविला होता. या संपूर्ण परिस्थितीबाबत बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी), जिल्हा यवतमाळ (पूर्व) यांनाही माहिती देण्यात आलेली आहे.
यावेळी शिवसेना कार्यकर्ते सुधाकर शिखरे, महादेव मुखरे, लक्ष्मण डाखोरे, प्रभाकर धोटे, शारदा चुनारकर, किशोर नित, अनिल माळोदे, प्रवीण राऊत, मनोज राऊत, कवडूजी गवारकर, नारायण मेश्राम, कांता माणिकराम रामगडे, दीपक कोडापे, मनोहर कोहळे, कवडूजी जुनगरे, प्रभाकर एकोणकार, विनायक नगराळे, महादेव लांबाडे, नितीन कोहळे, जगदीश बोरपे आदींसह अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या निवेदनावर घेण्यात आल्या.
➡️ आता नगरपंचायतीने तातडीने उपाययोजना करून अंगणवाडी केंद्रांची दुरवस्था दूर करावी, अशी जोरदार मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून करण्यात येत आहे.





