⛔महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण
✍️वणी | प्रतिनिधी
प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्धापनदिनानिमित्त माळी समाज संघटनेतर्फे सोमवार, २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजता वणी शहरातील माळीपुरा येथील म. फुले चौकात अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाची सुरुवात थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संविधान मूल्यांचा जागर करण्यात आला. तसेच स्वराज्याचे रक्षण करणारे, आदर्श लोकनायक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना मानाचा मुजरा करण्यात आला.

प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगताना वक्त्यांनी संविधान, समता, बंधुता व सामाजिक न्याय या मूल्यांचे समाज जीवनातील स्थान अधोरेखित केले. फुले दांपत्यांनी दिलेले शिक्षणाचे व सामाजिक सुधारणांचे योगदान, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेली घटनात्मक लोकशाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा आदर्श हे आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमाला सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी देशाच्या प्रगतीसाठी संविधानिक मार्गाने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माळी समाज संघटनेचे अध्यक्ष प्रवीण निकोडे, उपाध्यक्ष दशरथ निकोडे तसेच सल्लागार समितीचे प्रमोद निकुरे, पिसाराम वाढई, बापूजी वाढई, हर्षल शेंडे, कुणाल चौधरी, भास्कर मोहरले, बंडू वाढई व गजानन बोरुले यांनी विशेष परिश्रम घेतले.
तसेच माळी समाज महिला संघटना, वणी यांच्या वतीने सचिव रेखा रासेकर, उपाध्यक्ष पूजा गुरनुले, तसेच प्रणाली निकोडे, कुंदा निकोडे, रंजना वाढई, मीरा वाढई व विद्या मांदाडे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सक्रिय सहभाग नोंदवला.
शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडलेल्या या अभिवादन सोहळ्यामुळे प्रजासत्ताक दिनाचा उत्सव सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा ठरला.









