⛔फाल्गुन गोहोकार यांचे पांढरकवडा विभागाच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन; मागण्या मान्य न झाल्यास तीव्र जनआंदोलनाचा इशारा
✍️वणी : प्रतिनीधी
वणी उपविभागातील ढासळलेली वीज व्यवस्था, जीर्ण व धोकादायक वीजवाहिन्या आणि बोर्डा गावातील कथित अन्यायकारक वीजकपातीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली आहे. मनसे नेते राजू उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी महावितरणच्या पांढरकवडा विभागाच्या मुख्य अभियंत्यांना दोन स्वतंत्र निवेदने सादर करून विविध मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. अन्यथा येत्या ८ दिवसांत तीव्र ठिय्या आंदोलन व जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
🎯 जीर्ण वीजवाहिन्यांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका
पहिल्या निवेदनात वणी उपविभागातील जुन्या व जीर्ण झालेल्या वीजवाहिन्यांचा गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. नियमानुसार २५ वर्षांनंतर वीजवाहिन्या बदलणे आवश्यक असताना अनेक ठिकाणी अद्याप जुन्याच तारा वापरल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या तारा अनेक ठिकाणी इतक्या खाली लोंबकळत आहेत की नागरिकांच्या हाताला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे परिसरात यापूर्वी अनेक अपघात घडून जीवित व वित्तहानी झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच किरकोळ कारणांवरून ग्रामीण व शहरी भागातील वीजपुरवठा तासन्तास खंडित केला जात असून, काही गावांना सलग ४ ते ८ दिवस अंधाराचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नियमित वीजबिले भरूनही नागरिकांना दर्जाहीन सेवा मिळत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
मनसेने महावितरणला संपूर्ण वणी उपविभागातील वीजवाहिन्यांची तातडीने तपासणी करून धोकादायक व जीर्ण तारा बदलण्याची मागणी केली आहे.
🎯 बोर्डा गावावर दुजाभावाचा आरोप
दुसऱ्या निवेदनात घोन्सा सब-स्टेशनअंतर्गत येणाऱ्या मु.पो. बोर्डा (ता. वणी) येथील शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
निवेदनानुसार, बोर्डा गावासाठी पूर्वी अधिकृतपणे ८ तासांचा वीजपुरवठा केला जात होता. मात्र, गेल्या महिन्यापासून कोणतीही पूर्वसूचना न देता तो ६ तासांवर कमी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शेजारील गावांना नियमित १० तास वीजपुरवठा मिळत असताना बोर्डा गावाला केवळ ६ तास वीज देण्यात येत असल्याने महावितरणकडून दुजाभाव होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
🎯 शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
मनसेच्या निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या आहेत:
बोर्डा गावाचा वीजपुरवठा तातडीने १० तासांपर्यंत वाढवावा.
शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी सिंचन व इतर शेतीकामांसाठी नियमित सिंगल फेज वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा.
वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाल्यास दुरुस्ती कामात होणारी दिरंगाई थांबवून तातडीने उपाययोजना कराव्यात.
वणी उपविभागातील सर्व जीर्ण व धोकादायक वीजवाहिन्या बदलून वीजपुरवठा सुरळीत करावा.
🎯 ८ दिवसांत निर्णय न झाल्यास आंदोलन
“नागरिक आणि शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. महावितरण प्रशासनाने येत्या ८ दिवसांत ठोस निर्णय घेऊन वीजपुरवठ्याच्या समस्या सोडवाव्यात. अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र ठिय्या आंदोलन आणि व्यापक जनआंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा फाल्गुन गोहोकार यांनी दिला आहे.
तसेच आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महावितरण प्रशासनाची राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
🎯 अधिकाऱ्यांनाही प्रत पाठविली
सदर निवेदनांच्या प्रती यवतमाळ जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, वणी पोलीस निरीक्षक, झरी झोनचे उपविभागीय अभियंता आणि घोन्सा शाखा अभियंता यांनाही माहितीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.
निवेदन सादर करताना मनसे पदाधिकारी, परिसरातील नागरिक आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.








