✍️वणी :प्रतिनीधी
लोककला ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाज प्रबोधनाचे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. लोकसंस्कृतीचे प्रतिबिंब लोककलेतून उमटते. मात्र बदलती अभिरुची, आधुनिकतेचा अतिरेक आणि वाढते सांस्कृतिक आक्रमण यामुळे लोकाश्रयावर जिवंत राहणाऱ्या लोककला हळूहळू मागे पडत आहेत. त्यामुळे अशा लोककलांचे जतन व संवर्धन करणे ही आज काळाची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ लोककलावंत डॉ. दिलीप अलोने यांनी केले.
लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत वांजरी येथे आयोजित विशेष शिबिरात नकलांच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. या वेळी उपस्थित विद्यार्थी, स्वयंसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रम अधिकारी डॉ. नीलिमा दवणे आणि डॉ. विकास जुंगरी यांनी डॉ. दिलीप अलोने यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. यावेळी व्यासपीठावर सरपंच अरुणाताई जेनेकर, उपसरपंच अमोल कुंभारे तसेच विकास जेनेकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. अलोने यांनी सध्याच्या सामाजिक वास्तवाचे भान जपण्यासाठी संवेदनशीलता जिवंत ठेवण्याचे आवाहन केले. समाजातील विसंगती, राजकीय परिस्थिती आणि सामान्य माणसाच्या भावना या विषयांवर आधारित नकलांच्या माध्यमातून त्यांनी प्रभावी भाष्य केले.
“पट्ट्या महाद्या, मावलगन कवा होणार, मला निवडून द्या” अशा विनोदी पण आशयपूर्ण नकलांनी त्यांनी प्रेक्षकांना हसून-हसून लोटपोट होण्यास भाग पाडले. त्यांच्या समर्थ अभिनयशैली, अचूक संवादफेक आणि प्रसंगानुरूप विनोदामुळे संपूर्ण वातावरणात हास्याची लाट उसळली.
डॉ. अलोने यांच्या सादरीकरणाला विद्यार्थी व ग्रामस्थांकडून प्रचंड प्रतिसाद व टाळ्यांचा कडकडाट मिळाला.
मनोरंजनासोबतच सामाजिक संदेश देणाऱ्या या नकलांनी उपस्थितांना विचार करायलाही प्रवृत्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संजय बिलोरीया, स्वयंसेवक दुष्यंत खामनकर, ऋतुजा रामगिरवार, नीलिमा काथोटे, रुद्र कनाके आदींनी विशेष परिश्रम घेतले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या या उपक्रमामुळे लोककलेचे महत्त्व अधोरेखित होत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.









