✍️वणी प्रतिनिधि
घोंन्सा कोळसा खाण परिसरात सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामा दरम्यान झालेल्या गंभीर अपघातात एका सुरक्षा रक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवार, ४ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. अंधारात योग्य खबरदारी व सूचना फलक नसल्यामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून, संबंधित यंत्रणांच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव यशपाल बुरबुरे (वय ४३) असे आहे. ते घोंन्सा कोळसा खाणीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. सध्या ते डब्ल्यूसीएलच्या क्वार्टरमध्ये वास्तव्यास होते. नेहमीप्रमाणे रात्रीची ड्युटी पूर्ण करून ते आपल्या निवासस्थानाकडे परतत असताना, कुम्भारखनी येथील डब्ल्यूसीएल कार्यालया समोरील नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. अंधारामुळे अंदाज न आल्याने ते थेट पुलाच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या खोल खड्ड्यात कोसळले, अशी माहिती समोर येत आहे.
अपघातानंतर त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, घटनास्थळी कोणतेही ठळक सूचना फलक, सुरक्षा बॅरिकेड्स, प्रकाश व्यवस्था किंवा इशारा देणारी चिन्हे नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा अपघात केवळ दुर्दैवी नसून, बांधकाम करणाऱ्या संबंधित ठेकेदार व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे घडल्याचा संशय नागरिकांमध्ये व्यक्त केला जात आहे.
यशपाल बुरबुरे हे स्वभावाने अत्यंत मनमिळावू, शांत व कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. मूळचे राजूर कॉलरी येथील रहिवासी असलेले बुरबुरे नंतर वणी येथे स्थायिक झाले होते. त्यांच्या सौम्य वागणुकीमुळे व प्रामाणिक कामामुळे सहकारी, शेजारी आणि परिसरातील नागरिकांमध्ये त्यांचा मोठा परिचय होता. त्यांच्या अचानक व अशा दुर्दैवी निधनामुळे कुटुंबीय, नातेवाईक तसेच सहकाऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, पुलाच्या बांधकामादरम्यान आवश्यक सुरक्षा उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत, याबाबत चौकशी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या अपघातामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामांदरम्यान योग्य सुरक्षा व्यवस्था, सूचना फलक व प्रकाशयोजना बंधनकारक करण्यात याव्यात, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.









