✍️वणी : प्रतिनिधी
रासा ते साखरा मार्गावरील अत्यंत दयनीय अवस्थेत गेलेल्या रस्त्याच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने छेडलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. मनसेच्या तीव्र आंदोलनानंतर प्रशासनाने रस्त्याच्या दुरुस्तीबाबत लेखी आश्वासन दिल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या रस्त्याची अवस्था गेल्या अनेक महिन्यांपासून अत्यंत खराब झाली होती. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक ठरत होते. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले.
सन्माननीय राजूभाऊ उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच फाल्गुन गोहोकार यांच्या पुढाकाराने विभाग प्रमुख लक्ष्मण उपरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलना दरम्यान मनसे सैनिकांनी प्रशासनाकडे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची जोरदार मागणी केली.
या आंदोलनाची दखल घेत संबंधित विभागाने लेखी स्वरूपात आश्वासन दिले आहे. त्यानुसार सध्या रस्त्यावरील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात डांबरी बुजवून (डागडुजी) दुरुस्त करण्यात येणार असून मार्च महिन्यानंतर या रस्त्याच्या संपूर्ण नूतनीकरणासाठी पुढील कार्यवाही करून पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही प्रशासनाने दिली आहे.
मनसेच्या या आंदोलनामुळे अखेर प्रशासनाने रस्त्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या समस्येवर आता मार्ग निघण्याची आशा नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
या आंदोलनात मनसैनिकांसह अनेक गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये भोला चिकनकर, प्रतीक पानगटे, नंदलाल अहिरकर, संकेत मोहिते, सुरेश दुधकोहळ, उमेश झाडे, निखिल आस्वले, रोशन थाटे आदी कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती.
मनसेच्या या संघर्षामुळे रासा–साखरा मार्गाच्या दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.










