✍️वणी (प्रतिनिधी):
वणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशस्त मैदानावर शंभू फॅन्स क्लबच्या वतीने आयोजित ‘मनसे विदर्भ केसरी शंकरपट २०२६’ या भव्य स्पर्धेचा आज उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या रोमांचक शर्यतींनी अखेरच्या दिवशी उत्कंठेची परिसीमा गाठली. विदर्भातील विविध भागांतून दाखल झालेल्या ताकदवान आणि वेगवान बैलजोड्यांनी आपल्या दमदार कामगिरीने उपस्थित हजारो प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या हस्ते विजयी बैलगाडा मालकांना रोख पारितोषिके आणि मानाचे चषक प्रदान करण्यात आले. यावेळी त्यांनी ग्रामीण परंपरा आणि संस्कृती जपणाऱ्या अशा पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असल्याचे स्पष्टपणे नमूद केले.

स्पर्धेत ‘अ’ आणि ‘क’ अशा दोन गटांत चुरशीच्या लढती रंगल्या. ‘अ’ गटात वणी येथील कोमल प्रीतम नित यांच्या बैलजोडीने अव्वल स्थान पटकावत ५१,१०१ रुपयांचे रोख पारितोषिक आणि मानाचा चषक जिंकला. त्याच गटात अमडापूरच्या आरती संतोष कोरडे यांनी द्वितीय क्रमांक मिळवत ३१,१०१ रुपये, तर गोंधळी येथील निलेश प्रमोद काळमेघ यांनी तृतीय क्रमांकासह २१,१०१ रुपयांचे पारितोषिक मिळवले.
विशेष म्हणजे, ‘क’ गटातही कोमल प्रीतम नित यांच्या बैलजोडीने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत प्रथम क्रमांक पटकावला आणि ३१,१०१ रुपयांचे पारितोषिक आपल्या नावावर केले. या गटात खैरगावचे आनंदराव पाटील काकडे यांनी द्वितीय (२१,१०१ रुपये) तर पांढरकवड्याचे वैभव हुसकेवार यांनी तृतीय (१६,१०१ रुपये) क्रमांक मिळवला.

या स्पर्धेत दोन्ही गटांमध्ये मिळून तब्बल ३ लाख रुपयांच्या बक्षिसांची उधळण करण्यात आली. संपूर्ण स्पर्धा अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली. यासाठी शंभू फॅन्स क्लबचे अध्यक्ष उमेश बहिरे, उपाध्यक्ष प्रणय बोंडे, सचिव मोहन भरटकर, सहसचिव तालिब खान, कोषाध्यक्ष गणेश दोरखंडे आणि सहकोषाध्यक्ष महेश गाडगे यांनी परिश्रम घेतले.
स्पर्धेचे ‘रॉयल सर्जा’ मार्फत थेट प्रक्षेपण करण्यात आले, तर शाम राठोड यांनी वेळेचे काटेकोर नियोजन सांभाळले. या ऐतिहासिक आणि रंगतदार सोहळ्याला वणीसह परिसरातील हजारो बैलगाडा शौकीन, शेतकरी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
ग्रामीण क्रीडासंस्कृतीचा अभिमान असलेल्या या शंकरपटाने वणीच्या मातीत पुन्हा एकदा परंपरेचा ठसा उमटवला.








