⛔ ४८ तासांत कारवाई न झाल्यास ‘खळ्ळ-खट्याक’ वेकोलीला गर्भित इशारा
✍️ वणी / प्रतिनिधी
वणी परिसरातील वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या वणी नॉर्थ एरियामध्ये सुरू असलेली कोळसा वाहतूक सध्या स्थानिक नागरिकांच्या जीवावर उठली असून, या जीवघेण्या वाहतुकी विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसे वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांनी थेट राज्याच्या परिवहन मंत्र्यांना पत्र लिहून या परिसरातील कोळसा वाहतुकीतील नियमबाह्य प्रकार आणि आरटीओ विभागाच्या भ्रष्ट कारभारावर गंभीर आरोप केले आहेत. या पत्राद्वारे सह वेकोली प्रशासनाला दिलेल्या पत्रात ४८ तासांचा अल्टिमेटम देण्यात आला असून, तातडीने कारवाई न झाल्यास मनसे स्टाईलने ‘काम बंद’ आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
वणी नॉर्थ एरियात कोळसा वाहतुकीसाठी वापरली जाणारी अनेक वाहने ही अत्यंत खराब अवस्थेत असून त्यांच्याकडे वैध फिटनेस प्रमाणपत्र देखील नसल्याचे समोर आल्याचे त्यांनी म्हटले आले आहे. मोटार वाहन अधिनियम १९८८ आणि केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ मधील तरतुदींचे सरळ उल्लंघन करून ही भंगार वाहने रस्त्यावर धावत आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या परिसरात मोठ्या प्रमाणावर ओव्हरलोडिंग सुरू असूनही स्थानिक उपप्रादेशिक परिवहन विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. आरटीओ अधिकारी आणि कोळसा वाहतूकदार यांच्यातील ‘आर्थिक हितसंबंधांमुळेच’ नियमांची पायमल्ली करणाऱ्या या वाहनांवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा थेट आरोप इरशाद खान यांनी केला आहे. या भ्रष्ट साखळीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.
काही दिवसांपूर्वी भालर येथील एका ओ.बी. कंपनीत एका परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाला होता, परंतु प्रशासनाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. वेकोलि प्रशासन आणि परिवहन विभागाच्या हलगर्जीपणामुळे हे कोळसा वाहून नेणारे ट्रक म्हणजे आता ‘चालते-फिरते मृत्यूचे सापळे’ बनले आहेत. सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या भ्रष्ट व्यवस्थेला आता मनसे सहन करणार नाही, असे इरशाद खान यांनी ठणकावून सांगितले आहे.
प्रशासनाने जर पुढील ४८ तासांत सर्व जड वाहनांची फिटनेस तपासणी करून ओव्हरलोडिंगवर आळा घातला नाही, तर वणी नॉर्थ एरियात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल. यामध्ये होणाऱ्या कोणत्याही नुकसानीला सर्वस्वी परिवहन विभाग आणि वेकोलि प्रशासन जबाबदार राहील, असा थेट इशारा दिल्याने आता प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. वणीच्या जनतेच्या सुरक्षिततेसाठी मनसे आता ‘खळ्ळ-खट्याक’ पॅटर्न राबवण्याच्या तयारीत असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








