✍️वणी : प्रतिनीधी
संत साहित्य, वारकरी परंपरा आणि विस्मृतीत गेलेल्या संतांच्या कार्यावर सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन करणारे वणी येथील लेखक तथा अभ्यासक सुनील इंदुवामन ठाकरे यांचा पंढरपूरजवळील गोपाळपूर येथील प्रसिद्ध मंदिरात विशेष सत्कार करण्यात आला. संत परंपरेच्या अभ्यासासाठी आणि संत काशीबा गुरव महाराज यांच्या जीवनकार्यावरील संशोधनासाठी त्यांनी घेतलेल्या परिश्रमांची दखल घेत हा सन्मान करण्यात आला.
पंढरपूरजवळील गोपाळपूर येथील हे मंदिर ‘जनाबाईंचा संसार’ म्हणून संपूर्ण वारकरी संप्रदायात प्रसिद्ध असून, याच परिसरात संत काशीबा गुरव महाराजांची समाधी आहे. संत जनाबाई आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या मंदिर परिसरात वसलेले हे समाधीस्थळ वारकरी भक्तांसाठी श्रद्धेचे महत्त्वपूर्ण केंद्र मानले जाते.
संत काशीबा गुरव महाराज हे संत सावता महाराजांचे समकालीन मानले जातात. विशेष म्हणजे, संत सावता महाराजांच्या अभंगांचे लेखन करून ते जतन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संत काशीबा महाराजांनी केले असल्याचे सांगितले जाते. संत परंपरेतील हे मोठे योगदान प्रकाशात आणण्यासाठी सुनील ठाकरे यांनी काही दिवस पंढरपुरात मुक्काम करून विविध ऐतिहासिक, धार्मिक आणि साहित्यिक संदर्भांचा अभ्यास केला.
या संशोधन दौऱ्यादरम्यान त्यांनी गोपाळपूर येथील संत काशीबा महाराज समाधी मंदिराला भेट दिली. यावेळी संस्थानाचे अध्यक्ष दिलीपभाऊ भोसले तसेच काशीबा महाराज मठाचे ह.भ.प. माउली महाराज गुरव यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. संत साहित्याच्या जतनासाठी आणि दुर्लक्षित संतांचा इतिहास समाजासमोर आणण्यासाठी ठाकरे करत असलेल्या प्रयत्नांचे यावेळी मान्यवरांनी कौतुक केले.
सुनील ठाकरे यांनी यापूर्वीही संत काशीबा गुरव महाराजांवर ‘रिंगण’ या विशेषांकात लेखन केले आहे. मात्र अलीकडे समाधीस्थळाशी संबंधित काही नवी माहिती आणि ऐतिहासिक संदर्भ समोर आल्याने या विषयावरील संशोधनाला नवे वळण मिळाले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुढील संशोधन आणि विस्तृत लेखनाची जबाबदारी ‘रिंगण’चे संपादक सचिन परब यांनी सुनील ठाकरे यांच्यावर सोपविली आहे.
दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरातील विठ्ठल मंदिरात ‘रिंगण’ विशेषांकाचे प्रकाशन केले जाते. वारकरी संप्रदाय, संत परंपरा आणि संत साहित्य यांचा अभ्यासपूर्ण वारसा जतन करण्यासाठी हा विशेषांक महत्त्वपूर्ण मानला जातो. यावर्षी संतश्रेष्ठ नामदेवराय आणि ज्ञानेश्वर माउली यांच्या समकालीन असलेल्या १३ संतांवर आधारित विशेषांक प्रकाशित होणार आहे. यामध्ये संत कुर्मदास, जगमित्र नागा, जोगा परमानंद, कान्हो पाठक, संत काशीबा गुरव यांसह अनेक संतांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे.
आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर प्रकाशित होणारा हा विशेषांक वारकरी संप्रदाय, संत साहित्य अभ्यासक आणि भक्तांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून, संत काशीबा गुरव महाराजांच्या कार्याचा इतिहास नव्या पिढीसमोर आणण्यास मदत होणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.







