✍️यवतमाळ :अशफाक खान
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात अॅन्टी करप्शन ब्युरो (एसीबी) यवतमाळ पथकाने मंगळवारी (ता. १९ मे) कळंब येथील भूमीअभिलेख कार्यालयात मोठी कारवाई करत परिरक्षण भूमापक पदावरील महिला अधिकारीला २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महसूल व भूमीअभिलेख विभागात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील आरोपी लोकसेविका शितल विजयकुमार पांडे (वय ३७) या कळंब येथील भूमीअभिलेख कार्यालयात कार्यरत आहेत. तक्रारदार हे कोठा (वेणी) शिवारातील शेती तसेच प्लॉटची देखरेख करण्याचे काम करीत होते. संबंधित प्लॉट मालकाचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कायदेशीर वारसांची नावे फेरफार नोंदीत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू होती.
तक्रारदार यांनी या संदर्भात आरोपी अधिकारी यांची भेट घेऊन कायदेशीर वारसांची नावे फेरफारमध्ये नोंदवून देण्याची विनंती केली होती. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण करून देण्यासाठी आरोपी अधिकारी यांनी २५ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार अॅन्टी करप्शन ब्युरो, यवतमाळ येथे करण्यात आली.
तक्रारीनंतर एसीबीने १८ आणि १९ मे रोजी पडताळणी कारवाई केली. या दरम्यान आरोपी अधिकारी यांनी वारसांना कार्यालयात न बोलविता फेरफार नोंद करण्यासाठी स्वतःसाठी २५ हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच लाच स्वीकारण्यासही त्यांनी संमती दिली होती.
यानंतर मंगळवारी एसीबीने नियोजनबद्ध सापळा कारवाई राबविली. कळंब येथील भूमीअभिलेख कार्यालयातील त्यांच्या चेंबरमध्ये पंचांसमक्ष तक्रारदाराकडून २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने आरोपी महिला अधिकाऱ्याला रंगेहात पकडले. कारवाईदरम्यान संपूर्ण प्रक्रिया पंचांसमक्ष पार पडली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
या प्रकरणी कळंब पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
ही यशस्वी कारवाई बापू बांगर आणि सचींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत अभय आष्टेकर, पोलीस निरीक्षक मनोज ओरके, पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट तसेच एसीबी यवतमाळच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडून लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी तात्काळ अॅन्टी करप्शन ब्युरोशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीकडून करण्यात आले आहे. यासाठी नागरिकांना कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक ०७२३२-२४४००२, मोबाईल क्रमांक ८९७५७९१०६४ तसेच टोल फ्री क्रमांक १०६४ उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या कारवाईमुळे जिल्ह्यातील महसूल व भूमीअभिलेख विभागातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे.







