✍️वणी | प्रतिनिधी :
वणी तालुक्यात कथितपणे सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीच्या मुद्द्यावर प्रहार जनशक्ती पक्षाने आक्रमक भूमिका घेत राज्य उत्पादन शुल्क विभागाला थेट धारेवर धरले आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या कथित अवैध दारू व्यवसायावर प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप करत प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांकडे निवेदन सादर करून संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करण्याची जोरदार मागणी केली आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाच्या म्हणण्यानुसार, वणी शहरासह ग्रामीण भागात अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असून, वारंवार तक्रारी करूनही संबंधित यंत्रणेकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर काही अधिकाऱ्यांचे अवैध दारू विक्रेत्यांशी कथित आर्थिक संगनमत असल्याचा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. या आरोपांची निष्पक्ष व सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणण्याची मागणी प्रहारने केली आहे.
प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट भूमिका घेत सांगितले की, “आरोपांमध्ये तथ्य नसेल तर चौकशीत ते स्पष्ट होईल; मात्र आरोप सत्य आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनासह कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांवर जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी दोषींवर कोणतीही दया दाखवू नये.”
यावेळी प्रशासनाला इशारा देताना प्रहार जनशक्ती पक्षाने म्हटले की, अवैध दारू विक्री रोखण्यासाठी प्रभावी पावले उचलली नाहीत आणि निवेदनाची दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करण्यात आली नाही, तर पक्ष रस्त्यावर उतरून उग्र लोकआंदोलन छेडेल. अशा परिस्थितीत निर्माण होणाऱ्या कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला.
या निवेदनावेळी विधानसभा अध्यक्ष सतीश देरकर, प्रहार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुवीर कारेकर, धनराज भलामे, रशीद शेख, तबरेज सिद्दीकी, मंगेश मडावी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, या निवेदनामुळे वणी तालुक्यात राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, राज्य उत्पादन शुल्क विभाग या गंभीर आरोपांवर कोणती भूमिका घेतो आणि चौकशीसंदर्भात कोणते निर्णय घेतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.








