⛔पुनर्वसन, मोबदला आणि प्रलंबित जमीन संपादनावर तातडीने कार्यवाहीचे निर्देश; वर्षानुवर्षे संघर्ष करणाऱ्या ग्रामस्थांना दिलासा
✍️वणी: प्रतिनीधी
गेल्या अनेक वर्षांपासून पुनर्वसन, अपुरा मोबदला, प्रलंबित जमीन संपादन, खाणीत होणारे सुरुंग स्फोट आणि त्यातून घरांना बसणारे तडे तसेच वाढत्या प्रदूषणाच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या उकणीवासीयांच्या प्रश्नांना आता वेग मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वेकोलिचे अध्यक्ष-सह-व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) डॉ. हेमंत शरद पांडे यांनी बुधवारी, 12 ऑगस्ट रोजी उकणी गावाला प्रत्यक्ष भेट देत ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. विशेष म्हणजे, त्यांनी केवळ बैठकीपुरता आढावा न घेता थेट शेताच्या बांधावर जाऊन अद्याप संपादन न झालेल्या जमिनीची पाहणी केली. त्यामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या उकणीच्या पुनर्वसन आणि जमीन संपादनाच्या प्रश्नांना आता प्रत्यक्ष कार्यवाहीची दिशा मिळेल, अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
उकणी कोळसा खाण प्रकल्पामुळे गावकऱ्यांना निर्माण झालेल्या विविध समस्यांबाबत उकणी कोळसा खाण व पुनर्वसन प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. कामगार नेते संजय खाडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी वेळोवेळी आंदोलन, निवेदने आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करून पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर वेकोलिच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांनी थेट गावात येऊन परिस्थितीची पाहणी केल्याने संघर्ष समितीने समाधान व्यक्त केले आहे.

🎯 ग्रामस्थांच्या व्यथा सीएमडींसमोर
बुधवारी दुपारी सुमारे 3 वाजताच्या दरम्यान डॉ. हेमंत पांडे यांनी वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह उकणी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि प्रलंबित मागण्या जाणून घेतल्या.
संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी उकणी परिसरातील प्रदूषण, खाणीत होणाऱ्या सुरुंग स्फोटांमुळे घरांना पडणारे तडे, घरांच्या नुकसानीचा अपुरा मोबदला आणि अद्याप संपादित न झालेल्या शेतजमिनी या प्रमुख समस्या सीएमडींसमोर मांडल्या.
ग्रामस्थांच्या समस्या ऐकल्यानंतर डॉ. पांडे यांनी संबंधित वेकोलि अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष बांधावर जाऊन जमीन संपादनाच्या प्रश्नाची पाहणी केली. प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. त्यामुळे उकणीवासीयांच्या अनेक वर्षांच्या संघर्षाला आता प्रशासनिक पातळीवर ठोस प्रतिसाद मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.
🎯 १७० शेतकऱ्यांची जमीन अद्याप संपादनाच्या प्रतीक्षेत
उकणी खंड क्रमांक 1 परिसरातील सुमारे 15 टक्के जमीन अद्याप संपादित झालेली नसून जवळपास 170 शेतकऱ्यांची जमीन या प्रक्रियेत प्रलंबित असल्याचा मुद्दा ग्रामस्थांनी उपस्थित केला. कोळसा खाण प्रकल्पाचा विस्तार सुरू असताना जमीन संपादनाचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित राहिल्याने संबंधित शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे.
प्रलंबित जमीन संपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, अशी मागणी करण्यात आली. या प्रश्नाची सीएमडींनी प्रत्यक्ष पाहणी केल्याने संबंधित शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

🎯 घरांच्या नुकसानीसाठी बाजारभावाप्रमाणे मोबदल्याची मागणी
उकणी परिसरात खाणकामासाठी होणाऱ्या सुरुंग स्फोटांमुळे अनेक घरांना तडे गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्याचबरोबर खाण परिसरातील वाढत्या धुळीमुळे आणि प्रदूषणामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्याचेही संघर्ष समितीने सीएमडींच्या निदर्शनास आणून दिले.
पुनर्वसनाच्या वेळी घरांसाठी मिळणारा मोबदला अत्यल्प असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. त्यामुळे घरांच्या नुकसानीचे फेरमूल्यांकन करून सध्याच्या बाजारभावाचा विचार करत योग्य व न्याय्य भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच गावाचे पुनर्वसन सुरक्षित आणि योग्य ठिकाणी करण्यात यावे, अशीही आग्रही भूमिका ग्रामस्थांनी मांडली.
🎯 स्थानिकांना रोजगारात प्राधान्याची मागणी
उकणी कोळसा खाण प्रकल्पासाठी स्थानिकांच्या जमिनी आणि परिसराचा वापर होत असताना प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधींमध्ये प्राधान्य मिळावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्या कुटुंबांचे पुनर्वसन, योग्य मोबदला आणि रोजगार या तिन्ही बाबींवर ठोस निर्णय घेण्याची मागणी संघर्ष समितीने केली.
🎯 “प्रलंबित प्रश्नांना आता गती मिळण्याची अपेक्षा” — संजय खाडे
कामगार नेते संजय खाडे यांनी सीएमडी डॉ. हेमंत पांडे यांच्या प्रत्यक्ष भेटीचे स्वागत केले. ते म्हणाले, “सीएमडी साहेबांनी गावात येऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि गावकऱ्यांच्या वेदना जाणून घेतल्या, ही आमच्यासाठी दिलासा देणारी बाब आहे. संघर्ष समिती आणि उकणीवासीयांच्या वतीने त्यांच्या सकारात्मक भूमिकेबद्दल आम्ही मनःपूर्वक आभार मानतो. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांना आता गती मिळेल आणि लवकरच आमच्या मागण्या मार्गी लागतील, अशी आम्हाला आशा आहे.”

दरम्यान, सीएमडींच्या प्रत्यक्ष पाहणीमुळे उकणीच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, आता केवळ आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष कार्यवाही होण्याची अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. पुनर्वसन, जमीन संपादन, घरांच्या नुकसानीचा मोबदला आणि रोजगार या प्रश्नांवर वेकोलि प्रशासन कितपत जलद निर्णय घेते, याकडे उकणीवासीयांचे लक्ष लागले आहे.
यावेळी कामगार नेते व एचएमएसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवकुमार यादव, संजय खाडे, अर्जुन खापणे, विवेक धांडे, कुणाल बोंजे, सागर डांगे, कवडू पचारे, सुहास डाहुले, त्रिकाल ढापकस, अशोक गोवारदिपे, अक्षय ढापकस यांच्यासह संघर्ष समितीचे पदाधिकारी व सदस्य, उकणीवासी तसेच वेकोलिचे अधिकारी उपस्थित होते.







