✍️पांढरकवडा: अशफाक खान
आजच्या आधुनिक आणि दिखाऊ विवाह सोहळ्यांच्या काळात साधेपणाला प्राधान्य देत समाजासमोर एक आदर्श निर्माण करणारा विवाह सोहळा नुकताच जंगोदाई पेनठाणा टेकडी येथे पार पडला. दिनांक 10 मे 2026 रोजी दडांजे (घाटंजी) व मरसकोल्हे (झुली) परिवारातील आशिष दडांजे आणि समीक्षा मरसकोल्हे या मुक नवदांपत्याचा विवाह जंगोदाई विचारमंच पांढरकवडा यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अत्यंत साधेपणाने, सामाजिक बांधिलकी जपत आणि अनावश्यक खर्च टाळून संपन्न झाला.
या विवाहाची विशेष बाब म्हणजे नवरा आणि नवरी दोघेही मुक असूनही त्यांनी आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात मोठ्या आत्मविश्वासाने, आनंदाने आणि सकारात्मकतेने केली. उपस्थितांसाठी हा क्षण अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी ठरला. केवळ दोन व्यक्तींचा विवाह नसून समाजाला विचार करायला भाग पाडणारा हा एक सामाजिक संदेश असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
जंगोदाई विचारमंच पांढरकवडा यांनी समाजात साधेपणाचे आणि संस्कारांचे महत्त्व जपण्यासाठी काही नियम आखले असून त्या नियमांचे पालन करत हा विवाह पार पडला. विवाह सोहळ्यात साधेपणाला प्राधान्य देण्यात आले,
अवाजवी खर्च व दिखाव्याला पूर्णपणे नकार देण्यात आला,
पाहुण्यांसाठी साधे पण सन्मानपूर्वक जेवण ठेवण्यात आले,
तसेच विवाह विधी वेळेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आले.

आज अनेक विवाह सोहळ्यांमध्ये लाखो रुपयांची उधळपट्टी, डीजे, दिखाऊ सजावट आणि अनावश्यक खर्च पाहायला मिळतो. अशा परिस्थितीत जंगोदाई पेनठाणा टेकडीवर पार पडलेला हा विवाह समाजासाठी नवा आदर्श ठरत आहे. “खरे सुख हे दिखाव्यात नसते, तर प्रेम, समजूतदारपणा, परस्पर सन्मान आणि साधेपणात असते,” हा संदेश या विवाहातून अधोरेखित झाला. या सोहळ्याला जंगोदाई पेनठाणा ट्रस्ट परिवारातील सदस्य, नातेवाईक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नवदांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत जंगोदाई विचारमंचाच्या उपक्रमाचे कौतुक केले. समाजात वाढत्या खर्चिक विवाह पद्धतीला पर्याय म्हणून अशा साध्या विवाहांची चळवळ अधिक मजबूत व्हावी, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
जंगोदाई विचारमंचाचे पदाधिकारी यांनी सांगितले की, समाजात आर्थिक ओझे कमी व्हावे, अनाठायी कर्जबाजारीपणा थांबावा आणि विवाह हा आनंदाचा व संस्कारांचा सोहळा राहावा, या उद्देशाने मंचाकडून साध्या विवाहांना प्रोत्साहन दिले जाते. या उपक्रमाला समाजातून चांगला प्रतिसाद मिळत असून भविष्यातही अशाच सामाजिक आणि प्रेरणादायी उपक्रमांना चालना दिली जाणार आहे.
दडांजे आणि मरसकोल्हे परिवाराचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून नवदांपत्य आशिष व समीक्षा यांना उज्ज्वल, सुखी आणि समृद्ध वैवाहिक आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.








