✍️पांढरकवडा: अशफाक खान
यवतमाळ जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला राष्ट्रीय स्तरावर मानाचा तुरा मिळवून देणारी अभिमानास्पद कामगिरी केळापूर तालुक्यातील आदिवासी व दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, अर्ली यांनी साध्य केली आहे. आरोग्य क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या “राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन (National Quality Assurance Standards – NQAS) पुरस्काराने” अर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सन्मानित झाले असून, यामुळे संपूर्ण जिल्ह्याचा गौरव वाढला आहे.
दिल्लीस्थित केंद्रीय आरोग्य संस्था राष्ट्रीय आरोग्य व्यवस्था संसाधन केंद्र (NHSRC) यांनी निश्चित केलेल्या निकषांनुसार केंद्रीय स्तरावरील तज्ज्ञ समितीमार्फत दिनांक २३ जानेवारी ते २४ जानेवारी २०२६ दरम्यान केंद्राचे सखोल परीक्षण करण्यात आले. या समितीत गुजरातचे डॉ. मोसिन जाजुरा आणि आंध्र प्रदेशचे डॉ. पकाला साई चरण कुमार यांचा समावेश होता. त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेवा, सुविधा, व्यवस्थापन, स्वच्छता, रुग्णसेवा गुणवत्ता, औषध उपलब्धता, नोंदवही प्रणाली आणि रुग्ण समाधान या सर्व बाबींचे मुद्देनिहाय परीक्षण करून केंद्रीय समितीकडे अहवाल सादर केला.
९४ टक्के गुणांसह राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी
राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकनासाठी सहा प्रमुख विभागांमध्ये किमान ७० टक्के गुणांची अट असते. या कठोर निकषांमध्ये अर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राने तब्बल ९४ टक्के गुण मिळवत उत्कृष्ट कामगिरी नोंदवली.
या यशामुळे अकोला विभागातून प्रथम क्रमांक तसेच महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक गुण मिळवणारे प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून अर्लीची निवड झाली आहे.
विशेष म्हणजे, आदिवासी बहुल व दुर्गम भागात कार्यरत असलेल्या आरोग्य संस्थेने राष्ट्रीय स्तरावर गुणवत्ता सिद्ध केल्याने ग्रामीण आरोग्य व्यवस्थेसाठी हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.
🎯 सातत्यपूर्ण गुणवत्तेमुळे मिळाले अनेक पुरस्कार
अर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राने यापूर्वीही सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्याची परंपरा कायम ठेवली आहे.
सन २०१९-२० ते २०२४-२५ या कालावधीत केंद्राला तब्बल ६ वेळा जिल्हास्तरीय ‘कायाकल्प’ पुरस्कार (प्रथम व द्वितीय) प्राप्त झाले आहेत. तसेच शासनाच्या “सुंदर माझा दवाखाना” या उपक्रमांतर्गत सन २०२४-२५ मध्ये जिल्हास्तरावर प्रथम पारितोषिकही मिळाले आहे.
🎯आरोग्य कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाचे फळ
हे राष्ट्रीय मानांकन मिळविण्यामागे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष केंद्रे आणि डॉ. स्नेहल वाघाडे यांच्यासह अर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम कारणीभूत ठरले आहेत. रुग्णकेंद्रित सेवा, नियोजनबद्ध कामकाज आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे फलित मानले जात आहे.
🎯 प्रशासनाचे मार्गदर्शन ठरले निर्णायक
जिल्हाधिकारी विकास मीना (IAS) आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की (IAS) यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य विभागाने गुणवत्ता सुधारणा उपक्रम प्रभावीपणे राबवले.
या प्रक्रियेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले, एडीएचओ डॉ. क्रांतीकुमार नावंदीकर, एम.ओ.डी.टीटी. डॉ. मधुकर मडावी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना देठे, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल तायडे, डॉ. सचिन जाधव, डॉ. प्रीती दुधे (DPM), डॉ. अमोल गिरी (DQAC) आणि श्री. धम्मदीप गायकवाड (QA) यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र खैरगाव (दे) येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले.
🎯 नोडल अधिकारी म्हणून डॉ. संजय मडावी यांची महत्त्वपूर्ण भूमिका
राष्ट्रीय गुणवत्ता मानांकनाच्या पूर्वतयारीसाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मडावी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पुरस्कार मिळविण्याच्या उद्देशाने त्यांनी अहोरात्र परिश्रम घेत नियोजन, प्रशिक्षण, पडताळणी आणि गुणवत्ता सुधारणा प्रक्रियेचे प्रभावी नेतृत्व केले. या यशात त्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
🎯 नागरिकांकडून समाधान व कौतुक
दुर्गम भागातही दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होत असल्याने स्थानिक नागरिकांनी प्रशासन व आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहेत. राष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या या मानांकनामुळे परिसरातील नागरिकांचा सरकारी आरोग्य सेवांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
🎯 अभिप्राय–
या यशाचे खरे श्रेय डॉ.संजय मडावी (तालुका आरोग्य अधिकारी) मारेगाव व डॉ.सुभाष केंद्रे(वै.अ.) अर्ली तसेच अर्लीच्या आरोग्य कर्मचारी पथकाच्या अथक परिश्रमाचे यश आहे. त्यामुळे “राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन प्राप्त पुरस्काराकारीता” अर्लीच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन !
🔺डॉ.सुभाष ढोले
जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्हा परिषद, यवतमाळ
🎯 अभिप्राय-
या यशाचे खरे मानकरी डॉ.सुभाष केंद्रे व डॉ.स्नेहल वाघाडे (वै.अ.) प्रा.आ.केंद्र अर्ली यांनी “राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन पुरस्कार” प्राप्त करण्यासाठी केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार नियोजनबद्ध कार्य करून जिल्ह्याच्या आरोग्य विभागामध्ये आदिवासी ,दुर्गम भागामधून सर्वप्रथम हा राष्ट्रीय संन्मान यवतमाळ जिल्ह्याला प्राप्त करून देणारे पहिले प्राथमिक आरोग्य केंद्र, अर्ली ठरले आहे.
त्यामुळे “राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन प्राप्त पुरस्काराकारीता” अर्लीच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे कौतूकास्पद अभिनंदन !
🔺डॉ.संजय मडावी
तालुका आरोग्य अधिकारी
मारेगाव/पांढरकवडा









