✍️पांढरकवडा : अशफाक खान
केळापूर तालुक्यातील आसोली (तांडा) येथे शनिवारी रात्री भीषण आग लागून शेतकऱ्याच्या गोठ्यासह शेतीसाठी वापरात येणारे साहित्य जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या आगीत एका गायीचा जागीच मृत्यू झाला असून दोन बकऱ्या गंभीररीत्या भाजल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आसोली (तांडा) येथील शेतकरी श्रीराम संभुजी पवार यांच्या घरासमोरील गोठ्याला दि. १४ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ११.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच गावातील नागरिकांनी आरडाओरड करत श्रीराम पवार यांना झोपेतून उठवले आणि तात्काळ आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केल्याने आग नियंत्रणात आणणे कठीण झाले.

या भीषण आगीत अंदाजे ४० हजार रुपये किमतीची एक गाय जळून मृत्यूमुखी पडली, तर दोन बकऱ्या गंभीररीत्या भाजल्या आहेत. याशिवाय गोठ्यात ठेवलेले शेतीसाठी लागणारे अनेक साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले.
आगीत ६० स्प्रिंकलर पाईप, १६ स्प्रिंकलर नोझल, २ स्प्रे पंप, लाकूड फाटा सुमारे २० नग, वखरणी, २ नागर, १ बैलबंडी, तुरीचे कुटार तसेच सुमारे २० टिन पत्रे यांसह मोठ्या प्रमाणात शेती साहित्याचे नुकसान झाले असून एकूण नुकसान लाखोंच्या घरात असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच घाटंजी पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू असून गावकऱ्यांमध्ये याबाबत विविध चर्चा सुरू आहेत.
दरम्यान, घटनास्थळी पोलीस पाटील देविदास भाऊ तसेच प्रकाश वाघमारे यांनी भेट देऊन शेतकरी श्रीराम पवार यांना धीर दिला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.







