✍️वणी : प्रतिनीधी
उकणी येथील कोळसा खाणीत नुकत्याच घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने घटनास्थळी भेट देत परिस्थितीची सविस्तर पाहणी केली. खा. प्रतिभाताई धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजय खाडे यांनी दुर्घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष माहिती घेतली. यावेळी त्यांनी Western Coalfields Limited (WCL) प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत दुर्घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
दुर्घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पाहणीदरम्यान काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी खाण परिसरातील सुरक्षा व्यवस्थेची तपासणी केली तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर आणि प्रभावी उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी केली.
संजय खाडे यांनी WCL प्रशासनाला स्पष्ट शब्दांत जाब विचारत, “कामगारांच्या जीवाशी खेळ करणारी कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही. दुर्घटनेमागील दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी ठाम भूमिका मांडली. तसेच खाण क्षेत्रातील सुरक्षेचे सर्व निकष काटेकोरपणे पाळण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
यावेळी स्थानिक प्रकल्पग्रस्त नागरिक आणि त्यांच्या सुशिक्षित बेरोजगार मुलांच्या रोजगाराचा प्रश्नही प्रमुखत्वाने उपस्थित करण्यात आला. परिसरातील विविध कंपन्या आणि उद्योगांमध्ये स्थानिक युवकांना प्राधान्याने नोकरीच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने प्रशासनाकडे केली. “स्थानिकांच्या जमिनी गेल्या, परंतु रोजगार मिळाला नाही, ही वस्तुस्थिती बदलली पाहिजे,” असेही पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
वणी परिसरात मोठ्या प्रमाणावर कोळसा खाणींचे जाळे विस्तारलेले असल्याने कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. अनेक कामगार जीव धोक्यात घालून खाणीत काम करतात. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे, नियमित सुरक्षा तपासणी करणे आणि आपत्कालीन व्यवस्थापन अधिक प्रभावी बनवणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
पाहणी दौऱ्यानंतर काँग्रेसच्या प्रतिनिधींनी दुर्घटनेत बाधित झालेल्या खाणकामगार आसुटकर यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्या कुटुंबीयांना धीर देत आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले.
याशिवाय उकणी आणि पिंपळगाव गावांच्या पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न, उर्वरित जमीन संपादन प्रक्रिया तसेच प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना नोकरी देण्याबाबत प्रशासनासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. स्थानिक नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
या पाहणी दौऱ्यावेळी WCL चे मुख्य महाप्रबंधक खन्ना साहेब, उपक्षेत्रीय प्रबंधक स्वामी साहेब तसेच Western Coalfields Limited चे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दौऱ्यात संजय खाडे, प्रमोदभाऊ वासेकर, राजीव अंकितवार, अशोक चिकटे, विकेश पानघाटे, नंदू आसुटकर, बंडुभाऊ खीरटकर, मनोज खाडे, दादा खेडेकर, सुभाष ढवळे यांच्यासह उकणी गाव आणि परिसरातील मोठ्या संख्येने सुशिक्षित बेरोजगार युवक उपस्थित होते. स्थानिकांनीही कामगार सुरक्षा, पुनर्वसन आणि रोजगाराच्या मागण्यांबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या.










