✍️वणी | प्रतिनिधी
यवतमाळ जिल्ह्यातील शिरपूर पोलिसांनी अवैध गोवंश वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत ३४ गोवंशीय बैलांची सुटका केली असून या प्रकरणात सुमारे २६ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कार्यवाही 12 मे रोजी मध्यरात्री दरम्यान शिरपूर-चारगाव मार्गावरील नाकाबंदी दरम्यान करण्यात आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नियमित तपासणी व नाकाबंदी सुरू असताना एका संशयित कंटेनरला थांबवून त्याची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान कंटेनरमध्ये ३४ बैलांना अत्यंत अमानुष आणि क्रूर पद्धतीने कोंबून बांधण्यात आले असल्याचे आढळून आले. जनावरांना हालचाल करण्यासही जागा नसल्याने त्यांची अवस्था अत्यंत दयनीय होती.
वाहन चालकाकडे गोवंश वाहतुकीसाठी आवश्यक परवानगीपत्रे, वैद्यकीय प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रांची मागणी करण्यात आली. मात्र, चालकाकडून समाधानकारक माहिती अथवा कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत. यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीची सखोल चौकशी केली असता सरगम गुलाबसिंग धुर्वे याने गोवंश वाहतुकीसंदर्भात माहिती दिली.
प्राथमिक चौकशीत ही जनावरे कत्तलीसाठी नेली जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एनएल ०१ एजी १२८८ क्रमांकाचा कंटेनर ताब्यात घेतला. या कारवाईत अंदाजे २० लाख रुपये किंमतीचे वाहन तसेच ६ लाख ८० हजार रुपये किंमतीचे ३४ बैल असा एकूण २६ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९७६ तसेच प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.
ही कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वणी श्री. सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत शिरपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सपोनि संतोष मनवर, पोउपनि धीरज गुल्हाने, सहायक पोलीस हवालदार इकबाल शेख, पोलीस हवालदार प्रशांत झोड, अविनाश बानकर तसेच पोलीस कर्मचारी मंगेश सलाम, विजय फुलुके आणि किरण दासरवार यांनी सक्रिय सहभाग घेतला.
पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे अवैध गोवंश वाहतुकीला आळा बसण्यास मदत होणार असून परिसरात या कारवाईचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.










