⛔ १२ जण अटकेत; दोन तलवारी, लोखंडी रॉड, पाच काठ्या व चार दुचाकी जप्त
✍️पांढरकवडा: अशफाक खान
ताडउमरी गावाजवळ दोन गटांतील युवक तलवारी व लाठ्या घेऊन एकमेकांच्या जीवावर उठल्याची धक्कादायक घटना समोर आली असून पांढरकवडा पोलिसांच्या तात्काळ आणि धाडसी कारवाईमुळे संभाव्य रक्तपात व मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी दोन्ही गटांतील एकूण १२ जणांना अटक करण्यात आली असून शस्त्रांसह चार दुचाकी वाहनांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ९ जून २०२६ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ताडउमरी गावाजवळ दोन गटांतील युवक तलवारी व लाठ्यांसह आमनेसामने आल्याची माहिती पांढरकवडा पोलीस ठाण्याला प्राप्त झाली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे यांनी तातडीने पोलीस पथक घटनास्थळी रवाना केले. पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करत दोन्ही गटांतील युवकांना ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

या प्रकरणात आकीब बेग अहेफाज बेग मिर्झा (२८, रा. मोमीनाबाद कॉलनी, पांढरकवडा) यांच्या तक्रारीवरून करण संजय शिंदे (३२, रा. ताडउमरी), सुजित मोक्षवीर वानखेडे (२७), शेख समीर शेख चाँद (२५), पार्थ पंकज शेटे (२१), आशिष माणिक बेहेरे (२१), साईराम सुखदेव आगरकर (१९) आणि एका अल्पवयीन मुलाविरुद्ध पांढरकवडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७८७/२०२६ दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS), फौजदारी कायदा सुधारणा अधिनियम तसेच शस्त्र अधिनियमांतर्गत विविध कलमांन्वये कारवाई करण्यात आली.
तर दुसऱ्या बाजूला सुजित मोक्षवीर वानखेडे यांच्या फिर्यादीवरून आकीब अहेफाज मिर्झा (२८), नाझीम अहेफाज मिर्झा (२८), चिरंजीव रामदास लेनरे (२३), सैयद अदनाम अली (२४) आणि अनुप राजू कनाके (२०) यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक ७८८/२०२६ दाखल करण्यात आला असून त्यांनाही अटक करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, या वादातील करण संजय शिंदे आणि सुजित मोक्षवीर वानखेडे या दोघांनाही यापूर्वी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. मात्र तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून ते यवतमाळ जिल्ह्यात प्रवेश करून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या कृत्यात सहभागी झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ अन्वये स्वतंत्र गुन्हा क्रमांक ७८९/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
कारवाई दरम्यान पोलिसांनी दोन तलवारी, एक लोखंडी रॉड, पाच लाकडी काठ्या तसेच चार मोटारसायकली असा एकूण सुमारे २ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबीन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या मोहिमेत पोउपनि. नितीन सुशीर, पोहेकॉ. विलास जाधव, रजनीकांत पाटील, नापोको. सुनील राठोड, सचिन काकडे, पोकॉ. राजू मुत्तलवार, विशाल वाढई आणि विजय राठोड यांनी सक्रिय सहभाग घेतला.
सदर प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप नरसाळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पेंढारकर हे करीत आहेत.
🎯 तडीपार आरोपींकडून आदेशाचा भंग
या कारवाईतील सर्वात गंभीर बाब म्हणजे तडीपार असलेल्या दोन आरोपींनी जिल्ह्यात प्रवेश करून पुन्हा कायदा व सुव्यवस्थेला आव्हान दिल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध स्वतंत्र कारवाई सुरू केली असून अशा प्रवृत्तींवर कठोर नजर ठेवली जात असल्याचे दिसते.








