✍️पांढरकवडा: अशफाक खान
केळापूर तालुक्यातील महत्त्वाचा सायखेडा मध्यम प्रकल्प मंगळवार, दि.२२ जुलै २०२६ रोजी सकाळी ६.३० वाजेपर्यंत ९४.४० टक्के भरला असल्याची अधिकृत माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पुढील काही दिवसांत पुन्हा पाऊस झाल्यास धरण लवकरच शंभर टक्के क्षमतेने भरून सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी नदीपात्रात वाहू शकते. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
दि. २२ जुलै २०२६ रोजी सायखेडा मध्यम प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा अहवाल उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे उपविभाग क्र. ५, पांढरकवडा यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, केळापूर यांच्या कडे सादर केला आहे.

विशेष म्हणजे सायखेडा मध्यम प्रकल्प हा द्वारविरहित (Gate-less) प्रकल्प असल्याने धरणातील पाण्याचा प्रवाह नियंत्रित करता येत नाही. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर धरणात येणारे अतिरिक्त पाणी थेट सांडव्यावरून नदीपात्रात सोडले जाते. त्यामुळे पावसाच्या तीव्रतेनुसार नदीला अचानक पूर येण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

🎯 ‘या’ गावांनी विशेष सतर्क राहावे
संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर नदीकाठील पुढील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
🔺सायखेडा,
🔺लिंगटी,
🔺मोरवा,
🔺पिंपरी रोड,
🔺आकोली,
🔺पांढरकवडा,
🔺केळापूर,
🔺तातापूर,
🔺झुंजारपूर,
🔺ढोकी,
🔺साखरा,
🔺बल्लारपूर,
🔺वा-हा,
🔺कवठा,
🔺पाटणबोरी
या गावांतील नागरिकांनी नदीपात्राजवळ जाणे टाळावे, जनावरे व शेतीसाहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शाखा अधिकाऱ्यांना प्रकल्पावर सतत लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले असून, धरण १०० टक्के भरल्यानंतर सांडव्यावरील पाण्याच्या विसर्गाची माहिती वेळोवेळी वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
🎯 नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन
सध्या जिल्ह्यात गेल्या 2,3 दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांनी सूचनांचे पालन करावे. नदी, नाले आणि पूरप्रवण भागात जाणे टाळावे तसेच आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाशी त्वरित संपर्क साधावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.









