✍️पांढरकवडा : अशफाक खान
पांढरकवडा पोलिसांनी आधुनिक तांत्रिक प्रणालीचा प्रभावी वापर करत CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलच्या माध्यमातून हरविलेले व चोरीस गेलेले तब्बल ३० मोबाईल फोन शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत देत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या मोबाईल फोनची एकूण किंमत ₹४,१८,५०० असून, नागरिकांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलविण्यात पोलिसांना यश आले आहे.
पांढरकवडा पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांनी हरविलेल्या तसेच चोरीस गेलेल्या मोबाईल फोनबाबत दाखल केलेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेण्यात आली. त्यानंतर शासनाच्या CEIR पोर्टलच्या माध्यमातून प्रत्येक मोबाईलचा तांत्रिक पद्धतीने मागोवा घेण्यात आला. सातत्यपूर्ण प्रयत्न आणि तांत्रिक तपासाच्या आधारे ३० मोबाईल फोन यशस्वीरित्या शोधण्यात पोलिसांना यश मिळाले.

या मोबाईल फोनचे वितरण दि. २६ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता पांढरकवडा येथे आयोजित कार्यक्रमात सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबीन बन्सल यांच्या हस्ते संबंधित नागरिकांना करण्यात आले. हरविलेला मोबाईल पुन्हा मिळाल्याने लाभार्थी नागरिकांनी पोलिसांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक रॉबीन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे (ठाणेदार, पांढरकवडा), नापोको सचिन काकडे आणि मपोको अनुसया सामलवार यांनी CEIR पोर्टलचा प्रभावी वापर करून मोबाईल शोधून काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
🎯 CEIR पोर्टल म्हणजे काय?
CEIR (Central Equipment Identity Register) हे भारत सरकारचे अधिकृत पोर्टल असून, हरविलेले किंवा चोरीस गेलेले मोबाईल फोन ब्लॉक करणे, त्यांचा मागोवा घेणे आणि सापडल्यास पुन्हा सुरू करण्याची सुविधा या पोर्टलद्वारे उपलब्ध करून दिली जाते. या प्रणालीमुळे चोरीच्या मोबाईलचा गैरवापर रोखण्यास मदत होते.

🎯 पोलिसांचे नागरिकांना आवाहन
पांढरकवडा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, मोबाईल हरवल्यास किंवा चोरीस गेल्यास विलंब न करता तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी आणि CEIR पोर्टलच्या सुविधेचा लाभ घ्यावा. वेळेत तक्रार केल्यास मोबाईल शोधून मिळण्याची शक्यता अधिक वाढते.
पांढरकवडा पोलिसांनी केलेली ही कारवाई तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करणारी ठरली असून, भविष्यातही अशाच प्रकारे नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.









