✍️पांढरकवडा: अशफाक खान
कोची कॉनवेल प्रकल्पाच्या कामादरम्यान अधिकाऱ्यांनी व ठेकेदाराने नैसर्गिक नाल्याची दिशा बदलल्यामुळे एका शेतकऱ्याच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. रामपूर (कारेगाव) ता. केळापूर येथील शेतकरी विजय फणीधर खापर्डे यांनी याबाबत उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, केळापूर यांच्याकडे सविस्तर तक्रार अर्ज सादर केला असून, तातडीने दखल न घेतल्यास कुटुंबासह उपोषण करण्याचा इशाराही दिला आहे.
अर्जात नमूद केल्याप्रमाणे, शिवणी व कोची गावाच्या शिवधुरावर पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारा नैसर्गिक नाला कोची कॉनवेल प्रकल्पाच्या कामात अडथळा ठरत असल्याने तो जबरदस्तीने दक्षिणेकडून उत्तरेकडे वळविण्यात आला. हा नाला तसेच प्रकल्पातील अतिरिक्त पाणी थेट विजय खापर्डे यांच्या शेतात घुसल्याने कापूस पिकासह संपूर्ण शेती खरडून गेली. शेतातील सुपीक माती वाहून गेली असून, शेतामध्ये चक्क नवीन नालाच तयार झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, नाला वळविण्यापूर्वीच संभाव्य धोक्याची माहिती संबंधित पाटबंधारे अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती. “हा नाला दूरवरून मोठ्या प्रमाणात पाणी आणतो, त्याची दिशा बदलल्यास माझ्या शेताचे नुकसान होईल,” अशी स्पष्ट सूचना देऊनही ती दुर्लक्षित करण्यात आली. ठेकेदाराच्या सुपरवायझरने पोकलँड मशिनच्या सहाय्याने नाल्याची दिशा बदलल्याचा आरोपही अर्जात करण्यात आला आहे.
या प्रकरणी शेतकऱ्याने यापूर्वीही दोन वेळा अधिकृत अर्ज दिले आहेत. पहिला अर्ज २७ मे २०२५ रोजी, तर नुकसान झाल्यानंतर दुसरा अर्ज २९ ऑगस्ट २०२५ रोजी सादर करण्यात आला. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
विजय खापर्डे यांनी आपल्या मागण्यांमध्ये नाल्याची मूळ दिशा पूर्ववत करून पश्चिम-पूर्व वाहत ठेवणे, झालेल्या शेती व पिकाच्या नुकसानीची भरपाई संबंधित अधिकारी व ठेकेदाराकडून मिळवून देणे, तसेच शेताची दुरुस्ती करून सुपीक माती टाकून देण्याची स्पष्ट मागणी केली आहे. सध्या शिवधुरावरील पुलाचे काम सुरू असल्याने, भविष्यात नुकसान आणखी वाढण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
अर्जाच्या शेवटी त्यांनी स्पष्ट इशारा दिला असून, येणाऱ्या ७ दिवसांत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यास केळापूर उपविभागीय कार्यालयासमोर कुटुंबासह उपोषणास बसणार असल्याची नोंद घेण्याची विनंती केली आहे.
या तक्रारीची प्रत राज्यातील वरिष्ठ राजकीय नेतृत्वासह विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनाही पाठविण्यात आली असून, प्रशासन आता या गंभीर प्रकरणात काय भूमिका घेते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.











