✍️पांढरकवडा : अशफाक खान
पांढरकवडा येथून सुमारे २४ किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गालगत वसलेल्या महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर असलेल्या पिंपळखुटी येथे श्री समर्थ माधवराव महाराज यांच्या वार्षिक तीर्थयात्रेला आज सोमवार दिनांक ५ जानेवारी २०२६ पासून अधिकृत आणि भव्य प्रारंभ झाला आहे. ही यात्रा श्रद्धा, भक्ती, परंपरा आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक मानली जाते. यावर्षी या यात्रेचे १३७ वे वर्ष असून, विदर्भासह मराठवाडा, तेलंगणा व आंध्रप्रदेशातून हजारो भाविक मोठ्या उत्साहात सहभागी झाले आहेत.
🎯 यात्रेचा धार्मिक प्रारंभ
पौष वैद्य द्वितीय, दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी रात्री, श्री समर्थ माधवराव महाराज यांच्या मठातून पादुका घेऊन पायी रथयात्रेला प्रारंभ झाला. पाटणबोरी येथून रात्री सुमारे दहा वाजता रथाने पिंपळखुटीकडे प्रस्थान केले. टाळ-मृदुंगाच्या गजरात, भजन-कीर्तन करत, “माधवराव महाराज की जय” च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. रात्री उशिरा रथ पिंपळखुटी येथील पैनगंगा नदीकाठावरील वाळवंटात दाखल झाला. या आगमनाने यात्रेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
🎯 यात्रेचे प्रमुख कार्यक्रम
सोमवार, ५ जानेवारी (पौष वैद्य तृतीया)
🔺दिंडी, काला कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून रात्री महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार, ६ जानेवारी (पौष वैद्य चतुर्थी)
🔺दुपारी गंगापूजन, गणपतीचा सहस्त्रावर्तन आणि चंद्रोदयानंतर रात्री महाप्रसाद होणार आहे.
बुधवार, ७ जानेवारी
🔺रथ वाळवंटातून पाटणबोरीकडे प्रस्थान करणार आहे.
गुरुवार, ८ जानेवारी
🔺सकाळपर्यंत उत्सवाची सांगता होऊन, महाप्रसादानंतर श्री समर्थांच्या पादुका मूळ स्थानी – माधवराव महाराज मठात परत नेण्यात येणार आहेत.
🎯 ऐतिहासिक पार्श्वभूमी
ही पवित्र यात्रा सन १८८९ मध्ये श्री रामानंद महाराज यांनी सुरू केली. विशेष म्हणजे, याच वर्षी श्री समर्थ माधवराव महाराज यांचा जन्म झाला होता. पिंपळखुटी यात्रेचा इतिहास सुमारे २०० वर्षांहून अधिक जुना असल्याचे सांगितले जाते. तेव्हापासून ही यात्रा अखंडपणे सुरू असून आजही ती भाविकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे.
🎯 सामाजिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये
पैनगंगा नदीकाठावरील वाळवंटात भाविक आपुलकीने आप्पालू, वडे, पात्या आदी पदार्थांचा नैवेद्य अर्पण करतात. विविध समाजातील लोक स्वजनांना व भाविकांना वाळवंटात जेवण घालतात. ही यात्रा केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक सलोख्याचेही प्रतीक आहे.
यात्रेमध्ये रसवंतीगृहातील ताजे रस, भजे, जिलेबी यांचा भाविक मोठ्या प्रमाणात आस्वाद घेतात. तसेच मोठमोठी आकाशपाळणे, झुले व मनोरंजनाची साधने दाखल झाल्याने परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
🎯 प्रशासन व व्यवस्था
भाविकांच्या सोयीसाठी स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, वाहतूक नियोजन आदींची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासन व पोलिस यंत्रणा सज्ज असून, ग्रामस्थ, यात्रा समिती आणि स्वयंसेवक अहोरात्र परिश्रम घेत आहेत.
🎯 भाविकांची श्रद्धा
या यात्रेमुळे पाटणबोरी व पिंपळखुटी परिसर पूर्णतः उत्सवी वातावरणात न्हाऊन निघाला आहे. भाविक मोठ्या श्रद्धेने श्री समर्थ माधवराव महाराजांचे दर्शन घेत असून सुख-समृद्धी, आरोग्य व शांततेसाठी साकडे घालत आहेत.
🙏 पिंपळखुटी तीर्थयात्रा म्हणजे श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा महासंगम असून आजपासून या पवित्र यात्रेला भव्य आणि भक्तिमय सुरुवात झाली आहे.










