✍️पांढरकवडा | अशफाक खान
शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या एका तरुण शेतकऱ्याचा विजेचा तीव्र धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी (दि. २५ जानेवारी २०२६) रात्री घोन्सीपोड शिवारात घडली. जयेश अनिल दोडेवार (वय ३०, रा. उत्तरवार ले-आउट, पांढरकवडा) असे मृतकाचे नाव असून, या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल दोडेवार हे मूळचे किन्ही नंदपूर (ता. केळापूर) येथील रहिवासी असून ते सध्या पांढरकवडा येथे वास्तव्यास आहेत. ते घोन्सी येथील संजय चमेडिया यांची शेती मक्त्याने कसत होते. रविवारी दुपारी सुमारे ३.३० वाजता वडील अनिल दोडेवार हे भाजीपाला विक्रीसाठी पांढरकवड्याला आले होते. दरम्यान, रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास ते घरी परतले असता, मुलगा जयेश शेतात गेला असून तो फोन उचलत नसल्याची माहिती त्यांच्या पत्नीने दिली.
मुलाची चिंता लागल्याने अनिल दोडेवार यांनी तत्काळ घोन्सीपोड येथील शेताकडे धाव घेतली. शेतात पोहोचल्यावर जयेश विहिरीजवळील डी.पी. (डिस्ट्रीब्युशन पोल) जवळ बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळून आला. त्याच्या उजव्या हातावर विद्युत धक्क्याच्या खुणा स्पष्ट दिसून येत होत्या. त्यांनी तातडीने नातेवाईकांना आणि ओळखीच्या लोकांना बोलावले.
शुभम यंचलवार व इतर नातेवाईकांनी जयेशला तात्काळ उपजिल्हा रुग्णालय, पांढरकवडा येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर जयेशला मृत घोषित केले. सोमवारी (दि. २६ जानेवारी २०२६) सकाळी उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
दुपारी १२ वाजता पांढरकवडा येथील मोक्षधाम येथे जयेश दोडेवार यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. या वेळी नातेवाईक, मित्रपरिवार
व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अवघ्या ३० वर्षांच्या तरुणाचा असा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेमुळे शेतातील वीजपुरवठा, डीपी परिसरातील सुरक्षितता व विद्युत उपकरणांची देखभाल याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, अशा दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.










