✍️पांढरकवडा : अशफाक खान
मराठी भाषेचे जतन, संवर्धन व प्रसार व्हावा या उद्देशाने तालुका विधी सेवा समिती, केळापूर (पांढरकवडा) यांच्यातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम दि. २७ जानेवारी २०२६ रोजी पांढरकवडा येथील जिल्हा न्यायालय–१ व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या इमारत परिसरात उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश–१ तथा तालुका विधी सेवा समिती, केळापूरचे अध्यक्ष माननीय न्यायमूर्ती श्री. ए. एम. देशमुख हे होते. प्रमुख व्याख्याते म्हणून बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या प्राध्यापिका डॉ. अन्नपूर्णा चौधरी उपस्थित होत्या.

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. एम. ए. कोठारी (तदर्थ जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश), श्री. के. के. माने (दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर), श्रीमती एम. ए. कासिम (सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर), कु. सायमा शेख (द्वितीय सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर) उपस्थित होते. तसेच पांढरकवडा वकील संघाचे अध्यक्ष ऍड. आर. के. शेख, उपाध्यक्ष ऍड. जी. पी. खैरकार व इतर वकील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्याख्यानादरम्यान डॉ. अन्नपूर्णा चौधरी यांनी मराठी भाषेचा इतिहास, तिचा सांस्कृतिक वारसा, भाषेतील गोडवा आणि दैनंदिन जीवनात मराठीचा वापर वाढवण्याचे महत्त्व अत्यंत प्रभावी शब्दांत मांडले. मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती आपली ओळख, संस्कृती आणि अस्मिता असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी ऍड. जी. पी. खैरकार यांनीही मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात मराठीचा अधिकाधिक वापर करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात माननीय न्यायमूर्ती ए. एम. देशमुख यांनी न्यायव्यवस्थेत मराठी भाषेला अधिक महत्त्व देण्याची आवश्यकता अधोरेखित केली. सामान्य नागरिकांना न्यायप्रक्रिया समजण्यासाठी मराठी भाषेचा वापर प्रभावी ठरतो, त्यामुळे न्यायालयीन कामकाजात मराठीचा सन्मान राखणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला न्यायालयातील पक्षकार बंधू-भगिनी, वकील मंडळी, तसेच न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. सी. डी. पेठेवार यांनी प्रभावीपणे केले, तर ऍड. पडोळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका विधी सेवा समितीतील कर्मचारी व वकील मंडळींनी मोलाचे सहकार्य व योगदान दिले.
मराठी भाषा संवर्धनाच्या दृष्टीने न्यायालयीन स्तरावर घेण्यात आलेला हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला असून, भविष्यातही अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी भाषेचा गौरव व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.










