✍️पांढरकवडा : सारीम खान
पांढरकवडा शहरातील नामांकित आणि सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या केशरबाई चाहल स्मृति प्रतिष्ठान यांच्या वतीने सन २०२४–२५ चा सामाजिक पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, यावर्षी हा मानाचा पुरस्कार हिंदू–मुस्लिम ऐक्य, सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचे सशक्त प्रतीक म्हणून ओळखले जाणारे काजी गजनफर अली साहेब यांना प्रदान केला जाणार आहे.
हा पुरस्कार समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रेरणा देण्यासाठी दिला जातो. पुरस्काराचे स्वरूप ₹११,००० रोख रक्कम, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे आहे. काजी गजनफर अली साहेब हे एक अनुभवी शिक्षणतज्ज्ञ असून ते माजी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. सध्या ते जामा मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष तसेच शांतता समितीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
शहरात सामाजिक समरसता टिकवून ठेवणे, विविध समाजघटकांमध्ये संवाद वाढवणे, शांतता प्रस्थापित करणे, शिक्षणाचा प्रसार करणे तसेच गरजूंसाठी सतत पुढाकार घेणे या क्षेत्रात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे. त्यांच्या या दीर्घकालीन आणि निस्वार्थ सेवाभावाची दखल घेत, केशरबाई चाहल स्मृति प्रतिष्ठानने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.

संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या प्रतिष्ठित पुरस्काराने २० हून अधिक समाजसेवकांना गौरविण्यात आले आहे. दरवर्षी हा पुरस्कार भव्य समारंभात प्रदान केला जातो, ज्यामुळे समाजात सकारात्मक कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळते आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळते.
यावर्षीचा पुरस्कार वितरण सोहळा दिनांक १० फेब्रुवारी रोजी, केशरबाई चाहल यांच्या स्मृतिदिनानिमित्त, श्री शारदा ज्ञानपीठ विद्यालय, पांढरकवडा येथे आयोजित करण्यात आला आहे. या समारंभाला विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
हा पुरस्कार दरवर्षी शिक्षण, समाजसेवा, साहित्य, आरोग्य, महिला सक्षमीकरण तसेच विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना प्रदान केला जातो. प्रतिष्ठानचा मुख्य उद्देश समाजात सकारात्मक कार्य करणाऱ्या व्यक्तींना ओळख देणे, त्यांचा सन्मान करणे आणि इतरांनाही समाजकार्याकडे प्रेरित करणे असा उद्देश असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.अजितसिंह चाहल यांनी सांगितले.
काजी गजनफर अली साहेब यांच्या निवडीमुळे शहरात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक संघटना व नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या गौरवामुळे पांढरकवडा शहराचा सामाजिक सलोख्याचा आदर्श अधिक दृढ होईल, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.










