✍️पांढरकवडा | अशफाक खान
शहरात सुरू असलेल्या नवीन पाणीपुरवठा पाईपलाईनच्या कामामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून, विशेषतः मोमिनाबाद कॉलनी परिसरातील परिस्थिती गंभीर बनली आहे. रस्ते खोदून पाईपलाईन टाकल्यानंतर योग्य प्रकारे रस्त्याची दुरुस्ती व समपातळी (रोड लेव्हल) न केल्यामुळे सर्वत्र धूळ, माती व खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याने शहरवासीयांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या गंभीर समस्येच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद पांढरकवडा येथील प्रभाग क्रमांक ७ चे नगरसेवक मुहम्मद युसूफ यांनी आज सोमवार, दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजी नगरपरिषदेचे मा. मुख्याधिकारी (CO) यांना सविस्तर निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्या शहरात सुरू असलेल्या पाणीपुरवठा पाईपलाईनच्या कामामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. खोदलेले रस्ते योग्य पद्धतीने बुजवले जात नसल्याने धूळ उडत असून, त्यामुळे दमा (अस्थमा) रुग्ण, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक नागरिकांना श्वसनाचा त्रास, खोकला, डोळ्यांची जळजळ व इतर आजारांचा सामना करावा लागत आहे.
नगरसेवक मुहम्मद युसूफ यांनी ठेकेदाराच्या निष्काळजीपणाकडे लक्ष वेधत सांगितले की, पाईपलाईन टाकल्यानंतर रस्त्याची तात्काळ दुरुस्ती व समपातळी न केल्यामुळे वाहतूक विस्कळीत होत आहे, अपघातांचा धोका वाढला आहे आणि नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरत आहे.
निवेदनाद्वारे त्यांनी प्रशासनाकडे खालील महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत :
पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर त्वरित व दर्जेदार पद्धतीने रस्त्याची दुरुस्ती व समपातळी करण्यात यावी,
धूळ नियंत्रणासाठी पाणी फवारणी, माती झाकणे यासारख्या आवश्यक उपाययोजना तात्काळ राबवण्यात याव्यात,
संबंधित ठेकेदाराला याबाबत स्पष्ट सूचना देऊन जबाबदारी निश्चित करण्यात यावी.
“ही बाब अत्यंत गंभीर असून, नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित आहे. नगरपरिषद प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून योग्य ती कार्यवाही करावी,” अशी ठाम भूमिका नगरसेवक मुहम्मद युसूफ यांनी मांडली आहे.
दरम्यान, शहरातील विविध भागांतील नागरिकांनीही या समस्येबाबत नाराजी व्यक्त करत लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे. आता नगरपरिषद प्रशासन या निवेदनाची दखल घेऊन कोणती ठोस पावले उचलते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.










