✍️पांढरकवडा : अशफाक खान
नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर गोवंश तस्करीविरोधात पांढरकवडा पोलिसांनी पहाटेच्या सुमारास धाडसी कारवाई करत 27 गोवंशीय जनावरांची सुटका केली. या कारवाईत सुमारे 29 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी फरार झाला आहे.
दिनांक 29 मार्च 2026 रोजी पहाटे 4 वाजताच्या सुमारास पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, नागपूरकडून एक आयशर वाहन (क्रमांक MH 40 CT 1318) गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी करंजीमार्गे आदिलाबादकडे घेऊन जात आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी केळापूर टोल नाका, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 येथे सापळा रचला.
दरम्यान, संशयित वाहन दिसताच पोलिसांनी ते थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने वाहन थांबवून अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर वाहनाची तपासणी केली असता 27 बैलांना अत्यंत क्रूर पद्धतीने, मानेला दोरीने घट्ट बांधून व पाय जखडून वाहतूक करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले.
सदर जनावरांची अंदाजे किंमत 9 लाख 45 हजार रुपये असून जप्त आयशर वाहनाची किंमत सुमारे 20 लाख रुपये आहे. एकूण 29 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल पंचनामा करून पोलिसांनी ताब्यात घेतला. सुटका करण्यात आलेल्या सर्व गोवंशीय जनावरांना पांढरकवडा नगरपरिषद येथील कोंडवाड्यात सुरक्षित ठेवण्यात आले असून त्यांची पशुवैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 (सुधारित 1995) तसेच प्राणी क्रूरता प्रतिबंधक अधिनियम 1960 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात व सहाय्यक पोलीस अधीक्षक रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली पांढरकवडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार लहु तावरे, पोहेकॉ. उमेश कुमरे, पो.कॉ. विनेश राठोड आणि चालक प्रफुल पावसेकर यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गोवंश तस्करांमध्ये खळबळ उडाली असून, अशा बेकायदेशीर कृत्यांवर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








