✍️पांढरकवडा | अशफाक खान
पांढरकवडा येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, मोजणी, फेरफार व जमिनीच्या नोंदींशी संबंधित प्रकरणांमध्ये होत असलेल्या दीर्घकाळाच्या दिरंगाईमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांबाबत प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप होत असून, या पार्श्वभूमीवर ‘युवा टायगर फोर्स’ने आक्रमक भूमिका घेत “कुलूप ठोको” आंदोलनाची पूर्वसूचना दिली आहे.
🎯 नागरिकांचा वाढता संताप
मौजा पांढरकवडा परिसरातील शेतकरी व नागरिकांनी आपल्या शेतजमिनींच्या मोजणी, फेरफार, आखीव पत्रिका तयार करणे तसेच मालकी नोंदी अद्ययावत करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर केले आहेत. अनेकांनी शासनाने निर्धारित केलेले शुल्कही भरले आहे. मात्र, सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही या अर्जांवर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
यामुळे नागरिकांना वारंवार कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत असून, संबंधित कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याची तक्रार आहे. “आज या, उद्या या”, “फाईल पुढे गेली आहे” अशा प्रकारच्या टाळाटाळीच्या उत्तरांमुळे नागरिकांचा त्रास अधिकच वाढत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
🎯 पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह
काही नागरिकांनी “विशिष्ट प्रकरणांना प्राधान्य दिले जात असल्याचा” गंभीर आरोप केला आहे. यामुळे संपूर्ण प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाच्या कामकाजावर संशय व्यक्त केला जात आहे. नियमांनुसार सर्व अर्जांची समान पद्धतीने व ठरावीक कालमर्यादेत छाननी व निपटारा होणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात मात्र निवडक प्रकरणांना गती मिळत असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर रंगली आहे.
🎯 ‘युवा टायगर फोर्स’ची आक्रमक भूमिका
या पार्श्वभूमीवर ‘युवा टायगर फोर्स’ने पुढाकार घेत नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवल्या आहेत. संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, तहसीलदार पांढरकवडा आणि ठाणेदार, पोलीस स्टेशन पांढरकवडा यांना अधिकृत निवेदन सादर करण्यात आले आहे.
निवेदनात भूमी अभिलेख कार्यालयातील प्रलंबित मोजणी, फेरफार व नोंदी प्रकरणांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून, या समस्येचे तात्काळ निराकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच प्रशासनाने या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यास “कुलूप ठोको” आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.
🎯 कायदेशीर बाबींचा उल्लेख
निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 नुसार नागरिकांना वेळेत सेवा देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. तसेच नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांनुसार अर्जांवर अनावश्यक विलंब करणे हे अनुचित असून, अशा प्रकारच्या दिरंगाईमुळे नागरिकांचे आर्थिक व मानसिक नुकसान होत आहे.
🎯 संघटनेचा इशारा
‘युवा टायगर फोर्स’चे संयोजक अंकित नैताम यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत. अन्यथा आम्हाला ‘कुलूप ठोको’ आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. त्यांनी प्रशासनाला जवाबदारीची जाणीव करून देत नागरिकांना वेळेत सेवा देण्याची मागणी केली आहे.






