✍️पांढरकवडा: अशफाक खान
केळापूर तालुक्यातील उमरी (रोड) येथे बुधवारी दि. 22 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे मोबाईल दुकानाला लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची गंभीर घटना घडली. या आगीत दुकानातील मोबाईल, विविध इलेक्ट्रॉनिक साहित्य तसेच रोख रक्कम पूर्णतः जळून खाक झाली असून व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उमरी (रोड) येथील ‘श्रीराम मोबाईल शॉप’चे मालक दयाकर नरसिंगराव उपदेवार यांनी नेहमीप्रमाणे सकाळी दुकान उघडून दैनंदिन कामकाज सुरू केले होते. सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास ते जेवणासाठी दुकान बंद करून घरी गेले. त्यांच्या अनुपस्थितीत अचानक दुकानातून धूर निघत असल्याचे शेजारील कृषी केंद्राचे दुकानदार प्रशांत अडवलवार यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ उपदेवार यांना फोन करून याची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच उपदेवार तातडीने दुकानाजवळ पोहोचले. मात्र दुकानाचे शटर उघडत नसल्याने त्यांनी दगडाच्या साहाय्याने शटर उघडले. तोपर्यंत आगीने भीषण स्वरूप धारण केले होते आणि दुकानातील संपूर्ण साहित्य आगीत जळून नष्ट झाले होते.
या आगीत सुमारे १७ नवीन अँड्रॉइड मोबाईल, २२ की-पॅड मोबाईल, एक लॅपटॉप, मोबाईल रिपेअरिंगसाठी लागणारी यंत्रसामग्री, बॅटऱ्या, चार्जर, मोबाईल कव्हर, मोबाईल स्क्रीन गार्ड (ग्लास), पॉवर बँक, स्पीकर यांसह मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून गेले. याशिवाय ग्राहकांनी दुरुस्तीसाठी दिलेले मोबाईल देखील आगीत भस्मसात झाले. दुकानात ठेवलेली सुमारे ३० हजार रुपयांची रोख रक्कमही जळून नष्ट झाली.
दुकान मालकाने दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार या घटनेत अंदाजे ३.५० ते ४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे, मात्र याबाबत अधिकृत तपास सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच पांढरकवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून आगीमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.








