✍️मारेगाव– प्रतिनिधी
मारेगाव तालुक्यातील खंडणी गावातील नागरिकांना गेल्या तब्बल दोन वर्षांपासून अत्यंत दूषित, गढूळ तसेच लाल-पिवळसर पाण्याचा पुरवठा होत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे. दूषित पाण्यामुळे गावात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत विविध आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे अपुरा पाणीपुरवठा आणि दुसरीकडे मिळणारे पाणी आरोग्यासाठी घातक असल्याने ग्रामस्थ अक्षरशः त्रस्त झाले आहेत.
ग्रामस्थांनी अनेक वेळा ग्रामपंचायत व पंचायत समितीकडे तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अखेर या गंभीर प्रश्नाची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत आज मारेगाव पंचायत समितीवर जोरदार धडक दिली. मनसे नेते राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनामुळे पंचायत समिती प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.
🎯 दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
खंडणी गावात नळाद्वारे येणारे पाणी पूर्णपणे गढूळ व दूषित असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अनेक नागरिकांना पोटाचे विकार, त्वचारोग तसेच तापासारख्या आजारांना सामोरे जावे लागत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. ग्रामस्थांनी आंदोलनावेळी दूषित पाण्याच्या बाटल्या पंचायत समितीत आणून प्रशासनासमोर संताप व्यक्त केला.
यावेळी मनसे नेते राजू उंबरकर यांनी पंचायत समिती कार्यालयातच ग्रामसेवकाला दूषित पाण्याची बाटली दाखवत, “हेच पाणी गावकऱ्यांना प्यावे लागते, तुम्ही हे पाणी पिऊन दाखवा,” असा थेट सवाल करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली.
🎯 मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी थेट चर्चा
प्रश्नाची तीव्रता लक्षात घेऊन मनसे नेते राजू उंबरकर यांनी यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्याशी थेट फोनवरून संपर्क साधून संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तात्काळ मारेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले.
त्याचवेळी गावात त्वरित नवीन बोरवेल करून शुद्ध पाण्याचा पुरवठा सुरू करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या. गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकाला तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश देत नवीन पाण्याच्या स्रोताची व्यवस्था करण्यास सांगितले.
🎯 १५ वा वित्त आयोग आणि पेसा निधीतील गैरव्यवहाराचा आरोप
यावेळी ग्रामस्थांनी पंचायत समितीसमोर अनेक गंभीर आरोप मांडले. १५ वा वित्त आयोगांतर्गत मंजूर झालेल्या साहित्य खरेदी आणि विविध बांधकाम कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक तसेच पंचायत समितीतील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने बनावट बिले उचलण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
तसेच ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आजपर्यंत एकही ग्रामसभा घेण्यात आलेली नसल्याचा गंभीर मुद्दाही उपस्थित करण्यात आला. पेसा योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या निधीचा खर्च, खाते तपशील, पासबुक व्यवहार तसेच पेसा सदस्य निवड प्रक्रियेतही अनियमितता झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली.
🎯 सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती
मनसेच्या आक्रमक आंदोलनानंतर प्रशासनाने तातडीने पावले उचलत सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत केली आहे. या समितीमार्फत दूषित पाणीपुरवठा, वित्त आयोग निधी खर्च, पेसा योजनेतील व्यवहार तसेच ग्रामपंचायतीच्या कामकाजाची सखोल चौकशी केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
🎯 “शुद्ध पाणी मिळेपर्यंत शांत बसणार नाही” – राजू उंबरकर
यावेळी बोलताना मनसे नेते राजू उंबरकर यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला की, “खंडणी गावातील प्रत्येक नागरिकाच्या नळाला शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळेपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही. ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.”
मनसेच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासन अखेर सक्रिय झाले असून ग्रामस्थांमध्येही न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. आता चौकशी समितीच्या अहवालानंतर दोषींवर कोणती कारवाई होते आणि गावकऱ्यांना शुद्ध पाणी कधी मिळते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.










