⛔ विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड असह्य; सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला नैतिक पाठिंबा, शासनाला लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलनाचा इशारा
✍️पांढरकवडा : अशफाक खान
देशभरात वारंवार उघडकीस येणाऱ्या परीक्षा पेपरफुटीच्या घटना, भरती व स्पर्धा परीक्षांमधील वाढत्या अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ पांढरकवड्यात आज दि. 17 जुलै रोजी दुपारी युवा टायगर फोर्सच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राध्यापक, विविध सामाजिक संघटना, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या या मोर्चाने शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांची जोरदार मागणी करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
मोर्चा शहरातील प्रमुख मार्गांवरून घोषणाबाजी करत एसडीओ कार्यालयावर पोहोचला. त्यानंतर झालेल्या सभेत शिक्षण व्यवस्थेतील वाढत्या त्रुटींवर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड केली जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा युवा टायगर फोर्सने शासनाला दिला.
मोर्चानंतर नायब तहसीलदार यांच्यामार्फत केंद्र व राज्य शासनाला सविस्तर निवेदन देण्यात आले. या निवेदनाच्या प्रती पंतप्रधान, केंद्रीय शिक्षण मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, संबंधित मंत्री, मुख्य सचिव, प्रधान सचिव, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासह सर्व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

आंदोलनादरम्यान शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, परीक्षा प्रक्रियेतील विश्वासार्हता आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला युवा टायगर फोर्ससह उपस्थित विद्यार्थी, पालक व विविध सामाजिक संघटनांनी नैतिक पाठिंबा जाहीर केला. विद्यार्थ्यांना सुरक्षित, निष्पक्ष आणि पारदर्शक परीक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी एकमुखी मागणी करण्यात आली.
सभेचे सूत्रसंचालन राम भेंडाळे यांनी केले. युवा टायगर फोर्सचे मदन जिद्देवार, शंकर बडे, बंडू सोयाम, मोहन मामीडवार, कु. दीक्षा गुरनुले, सुषमा राजदीप, जयंत वासरीकर, प्रा. प्रतीक्षा गुरनुले आणि राजेंद्र राजदीप यांच्यासह अनेक मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर परखड भूमिका मांडली. शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार, परीक्षा प्रक्रियेतील निष्काळजीपणा आणि पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याची खंत व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
🎯 निवेदनातील प्रमुख मागण्या
🔺पेपरफुटीच्या सर्व प्रकरणांची निष्पक्ष व वेळबद्ध चौकशी.
🔺दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई व जलदगती न्यायप्रक्रिया.
🔺तंत्रज्ञानाधारित, सुरक्षित आणि पारदर्शक परीक्षा प्रणाली लागू करणे.
🔺विद्यार्थ्यांसाठी मानसिक आरोग्य समुपदेशन व सहाय्य केंद्रांची स्थापना.
🔺शिक्षण क्षेत्रातील सर्वंकष सुधारणांसाठी तज्ज्ञ समितीची नियुक्ती.
🔺परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करणे.

युवा टायगर फोर्सने स्पष्ट केले की, विद्यार्थ्यांच्या हिताशी संबंधित प्रश्नांवर कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही. शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास संविधानाच्या चौकटीत राहून राज्यभर व्यापक आणि तीव्र लोकशाही जनआंदोलन उभारण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी हा संघर्ष अधिक व्यापक करण्याचा निर्धारही संघटनेने व्यक्त केला.
या आंदोलनात मदन जिद्देवार, शंकर बडे, मनोज भोयर, रितेश परचाके, संजय झोटिंग, संजय औदार्य, सागर व्यास, नरेश मानकर, अमर पाटील, गणेश बोरकुटे, अरुण डोंगशणवार, मोहन मामीडवार, बंडू सोयाम, अमर वंजारी, राम भेंडाळे, शेषराव जिद्देवार, लक्ष्मण गुरनुले, सूरज जयस्वाल, विशाल तुपट, उमेश पंचोली, अनिस पोसवाल, भैय्या ठमके, संतोष राऊत, बबन गुरनुले, दत्तात्रय ठाकरे, नामदेव पडोळे, ईक्रम अली, अमृत वानखेडे, शुभम राजगडे, अमोल चव्हाण, अभिलाष उमरे, शुभम जिद्देवार, अतिश इटकरे, जयंत वासरीकर, भाऊराव ठाकरे, सुरेश काळे, गनपत मेश्राम, प्रेम गेडाम, राजेंद्र राजदीप, विजय चौधरी, दिलीप गावंडे, अयुब शेख, विजय उईके, मुरली भिडकर, विनोद वनकर, नागोराव इंचोलकर, अमित पोतराजवर, संजय मिट्पेल्लिवार, संतोष करपे, संतोष डोंगरे, हणमंतू रजनलवार, अशोक बेले, संजय चन्नावार, रामचंद्र अडते, संतोष सेंगर, प्रदीप नारनवरे, संतोष पेंढारवार, शुभम वरगंटवार, कु. प्रतीक्षा गुरनुले, जयश्री अतिश शेंडे, सुषमा राजदीप, दीक्षा गुरनुले, अनुष्का संजय इंगोले, निकिता अमर झाडे, अंकिता अमर झाडे, अक्षरा विजय गाऊत्रे, पलक वसाके, पिंकी वसाके, श्रुष्टी उराडे, संचिता आडे, कशिश कनाके, रेखा मोहुर्ले, शुभांगी शेंडे यांच्यासह युवा टायगर फोर्सचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राध्यापक आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
शिक्षणाच्या प्रश्नावर पांढरकवड्यात उमटलेला हा जनआक्रोश केवळ स्थानिक आंदोलन न राहता राज्यव्यापी जनचळवळीचे स्वरूप धारण करण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र दिसून आले. आता शासन या मागण्यांवर कितपत संवेदनशीलतेने निर्णय घेते, याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.









