✍️वणी | प्रतिनिधी
खरीप हंगामात बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेचे वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या नेतृत्वात पक्षाच्या पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी पांढरकवडा येथील उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देत बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्या व विक्रेत्यांवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली.
यंदाच्या खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून सोयाबीनची पेरणी केली. मात्र, काही कंपन्यांच्या बियाण्यांची उगवण न झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. विशेषतः बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रा. लि. कंपनीच्या ‘हुतुतू’ या सोयाबीन बियाण्याची उगवण झाली नसल्याच्या तक्रारी अनेक शेतकऱ्यांनी केल्या आहेत.

निवेदनाद्वारे मनसेने संबंधित शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये तातडीने पंचनामे करण्याची, बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्या आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाई करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची तसेच बाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळवून देण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात २ ते ३ दिवसांत ठोस कारवाई झाली नाही, तर शेतकऱ्यांच्या न्यायासाठी फाल्गुन गोहोकार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला.
निवेदन देताना फाल्गुन गोहोकार यांच्यासह गोविंदजी थेरे, संजय गौरकर, आशिष ठावरी, सोमेश्वर ढवस, धीरज पेचे, मनोज उरकुडे, सुमित ठेंगणे तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.











