⛔कारवाई न झाल्यास वेकोली कार्यालयासमोर संविधानिक आंदोलनाचा इशारा; प्रतीकात्मक कचरा टाकून निषेध नोंदविणार
✍️वणी : प्रतीनिधी
तालुक्यातील राजूर गावात गेल्या अनेक महिन्यांपासून कचरा व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते फैजल बशीर खान व सय्यद मोसिम यांच्या नेतृत्वाखाली युवकांच्या शिष्टमंडळाने वेकोली राजूर क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक यांना निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, राजूर गावातील अनेक भागांमध्ये कचऱ्याचे मोठमोठे ढीग साचले असून काही कचरा संकलन केंद्रांवरील कचरा तब्बल तीन महिन्यांपासून उचलण्यात आलेला नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
यावेळी कचरा व्यवस्थापनाच्या कामकाजावरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. कचरा संकलन व विल्हेवाट लावण्याची जबाबदारी असलेली यंत्रणा तसेच संबंधित ठेकेदार प्रभावीपणे काम करत नसल्याचा आरोप करण्यात आला. वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नसल्याने संपूर्ण राजूर गाव कचऱ्याच्या विळख्यात सापडल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

यासंदर्भात वेकोली प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून संबंधित ठेकेदाराची जबाबदारी निश्चित करावी, तसेच गावातील साचलेला सर्व कचरा त्वरित उचलून व्यापक स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
ग्रामस्थांनी वेकोली प्रशासन व संबंधित ठेकेदाराला २४ तासांचा अल्टिमेटम दिला असून या कालावधीत समाधानकारक कारवाई न झाल्यास वेकोली कार्यालयासमोर संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच, प्रशासनाच्या निष्क्रियतेच्या निषेधार्थ कार्यालयासमोर गावातील साचलेला कचरा टाकून प्रतीकात्मक आंदोलन करण्यात येईल, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. आंदोलनाची वेळ आल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासन व ठेकेदारावर राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी दानिश काझी, आमीन शेख, वेदांत हिकरे, प्रियांशू आत्राम आणि अजय आडकिलवार उपस्थित होते.











