⛔ राजू उंबरकर यांच्या पुढाकारातून ‘अमित साहेब ठाकरे दत्तक योजना’ अंतर्गत उपक्रम; ग्रामीण विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
✍️वणी | प्रतिनिधी
महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या ढिसाळ नियोजनामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांसह शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वेळेवर बस उपलब्ध न होणे, जुनाट व अपुऱ्या बसेस, तसेच विद्यार्थ्यांच्या पासासंदर्भातील रखडलेले प्रश्न यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेत चनोडा ते मारेगाव या मार्गावर मोफत बस सेवा सुरू केली आहे.
मनसे नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून ‘अमित साहेब ठाकरे दत्तक योजना’ अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुरक्षित, नियमित आणि वेळेवर प्रवासाची सुविधा उपलब्ध व्हावी तसेच वाहतुकीअभावी त्यांच्या शिक्षणात कोणताही खंड पडू नये, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे मनसेकडून सांगण्यात आले.
ग्रामीण भागासाठी मानव विकास मिशन अंतर्गत बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या असल्या, तरी त्या अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या थांब्यांवर न थांबल्याने विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. अनेक विद्यार्थ्यांना पायी प्रवास करावा लागत असल्याने शैक्षणिक नुकसानही होत होते. या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या मोफत बस सेवेचे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांकडून स्वागत होत आहे.

या बस सेवेच्या उद्घाटनप्रसंगी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, मारेगाव तालुका अध्यक्ष रुपेश ढोके, शहराध्यक्ष चांद बहादे, तालुका उपाध्यक्ष उदय खिरटकर, रोशन शिंदे, निखिल मेहता, आकाश खामणकर, ॲड. योगेंद्र तुराणकर यांच्यासह मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाच्या निमित्ताने एसटी महामंडळाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि नियमित प्रवास उपलब्ध करून देणे हे एसटीचे मूलभूत कर्तव्य असताना, अनेक ग्रामीण भागांत ही जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली जात नसल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे. सरकारकडून विद्यार्थ्यांसाठी मोफत किंवा सवलतीच्या प्रवासाच्या घोषणा केल्या जात असल्या, तरी प्रत्यक्षात अनेक विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे चित्र कायम आहे.
मनसेने सुरू केलेल्या या मोफत बस सेवेने चनोडा–मारेगाव मार्गावरील विद्यार्थ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी ग्रामीण भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी राज्य परिवहन विभाग आणि एसटी महामंडळाने ठोस उपाययोजना करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. आता या प्रश्नावर शासन आणि परिवहन विभाग कोणती ठोस पावले उचलणार, याकडे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.










