⛔१० हजारांहून अधिक पालक-विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; प्रा. वसंत हंकारे यांच्या हृदयस्पर्शी प्रबोधनाने उपस्थित भावूक
✍️पांढरकवडा | सफी खान
पालक-विद्यार्थ्यांमधील संवादाचा अभाव, वाढता सोशल मीडियाचा प्रभाव, चुकीची संगत आणि क्षणिक आकर्षणांच्या विळख्यात अडकणाऱ्या तरुणाईला संस्कार, संवाद आणि जीवनमूल्यांची दिशा देणारा ‘न समजलेले आई-बाप’ हा भव्य पालक-विद्यार्थी महासंवाद सोमवारी (दि. २४ ऑगस्ट) पांढरकवड्यात पार पडला. युवा टायगर फोर्सच्या पुढाकाराने माऊली सेलिब्रेशन हॉल, चालबर्डी रोड येथे आयोजित या महासंवादाला १० हजारांहून अधिक पालक, विद्यार्थी व नागरिकांची अभूतपूर्व उपस्थिती लाभली.
सुप्रसिद्ध समाजप्रबोधक प्रा. वसंत हंकारे यांनी आपल्या ओघवत्या, प्रभावी आणि हृदयस्पर्शी शैलीत पालक-विद्यार्थी नात्याचे विविध पैलू उलगडले. आई-वडिलांचा त्याग, मुलांप्रती असलेल्या अपेक्षा, शिक्षण, करिअर, प्रेमसंबंध, सोशल मीडिया, चुकीची संगत आणि जीवनातील योग्य निर्णय यावर त्यांनी केलेल्या प्रभावी मार्गदर्शनाने सभागृह अक्षरशः भावूक झाले. अनेक पालक व विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
🎯 आई-वडिलांच्या त्यागाची जाणीव करून देणारा संवाद
जन्मापासून ते शिक्षण, करिअर, विवाह आणि स्वावलंबनापर्यंत आई-वडील मुलांसाठी आयुष्यभर करत असलेल्या त्यागाचे वास्तव प्रा. हंकारे यांनी प्रभावीपणे मांडले. मुलांच्या भवितव्यासाठी पालक स्वतःच्या इच्छा, गरजा आणि सुखाचा त्याग करतात; मात्र मोठे झाल्यानंतर अनेकदा मुलांना या त्यागाची जाणीव राहत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
पालकांनी मुलांवर केवळ अपेक्षांचे ओझे न टाकता मित्रत्वाच्या नात्याने संवाद साधावा, तर विद्यार्थ्यांनीही आई-वडिलांचे कष्ट, प्रेम आणि त्याग समजून घेऊन आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत, असा संदेश त्यांनी दिला.

🎯 सोशल मीडिया आणि चुकीच्या आकर्षणांपासून सावध राहण्याचे आवाहन
आजच्या डिजिटल युगातील आव्हानांवरही प्रा. हंकारे यांनी विद्यार्थ्यांना सावध केले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनोळखी व्यक्तींशी मैत्री करताना दक्षता बाळगावी. प्रेमाच्या नावाखाली निर्माण होणारे भावनिक जाळे, चुकीची संगत, मोबाईलचा अतिवापर आणि क्षणिक आकर्षण यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला.
अशा प्रसंगी विद्यार्थ्यांनी अडचणी लपवून न ठेवता पालक, शिक्षक किंवा आवश्यकतेनुसार कायदेशीर यंत्रणेची मदत घ्यावी, असेही त्यांनी आवाहन केले. पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये सातत्यपूर्ण व मोकळा संवाद हीच अनेक समस्यांवर प्रभावी उपाययोजना आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
🎯 ‘ना भूतो ना भविष्यती’ उपस्थिती
पांढरकवड्यातील या महासंवादाला लाभलेली हजारोंची उपस्थिती आणि कार्यक्रमादरम्यान निर्माण झालेले भावनिक वातावरण यामुळे हा कार्यक्रम शहराच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अविस्मरणीय पर्व ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. हा केवळ एक कार्यक्रम न राहता पालक-विद्यार्थी नात्यात संवाद, संस्कार आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करणारे व्यापक समाजप्रबोधन अभियान ठरले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करण्यात आले. गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने सादर करण्यात आलेल्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. राहुल भानेगावकर यांनी सूत्रसंचालन केले, तर युवा टायगर फोर्सचे संस्थापक अध्यक्ष मदन जिद्देवार यांनी प्रास्ताविक केले.

🎯 पोलीस व शिक्षण विभागाचा सहभाग
कार्यक्रमाला पांढरकवडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार लहु तावरे तसेच पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी राजू मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती. युवा टायगर फोर्सच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
तालुक्यातील विविध शैक्षणिक संस्था, शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. ॲड. आकांक्षा मनोज भोयर यांनी आभार मानले.
🎯 शिक्षकांसाठी ‘आनंदमय शिक्षक प्रशिक्षण’ सत्र
महासंवादानंतर शिक्षकांसाठी विशेष ‘आनंदमय शिक्षक प्रशिक्षण वर्ग’ घेण्यात आला. प्रा. वसंत हंकारे यांनी विद्यार्थ्यांची मानसिकता, त्यांच्या समस्या, प्रभावी अध्यापन पद्धती आणि विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधण्याचे तंत्र याबाबत शिक्षकांना मार्गदर्शन केले.
शिक्षण केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या भावविश्वाशी जोडले गेले पाहिजे, यावर त्यांनी विशेष भर दिला. प्रशिक्षण सत्रात शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. हसत-खेळत आणि आनंदी वातावरणात पार पडलेल्या या सत्राच्या शेवटी विठुरायाच्या गजरात शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आनंद व्यक्त केला.
🎯 नियोजनासाठी युवा टायगर फोर्सचे कौतुक
दहा हजारांहून अधिक नागरिकांच्या उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर बैठक व्यवस्था, वाहतूक, प्रवेश, सुरक्षा, स्वयंसेवक आणि अन्य आवश्यक बाबींचे नियोजन युवा टायगर फोर्सच्या वतीने करण्यात आले होते.
मुख्य संयोजक अंकित नैताम यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. मदन जिद्देवार, शंकर बडे, प्रेमराव वखरे, संजय झोटिंग, रितेश परचाके, आनंद वैद्य, मनोज भोयर, गणेश बोरकुटे, डॉ. संजय तोडासे, राजू मोटेमवार, संजय चन्नावार, सुनील कोपुलवार, श्रीकांत काळे, देवानंद चन्नावार, नितीन कांबळे, संजय औदार्य, सागर व्यास, मुरलीधर बिडकर, संतोषसिंग शेंगर, इकराम अली, डच्चू सोखी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशासाठी योगदान दिले.

🎯 सहकार्य करणाऱ्या संस्थांचे आभार
कार्यक्रमासाठी माऊली सेलिब्रेशन हॉल व्यवस्थापनाने हॉल व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजकांनी विशेष आभार मानले. तसेच श्री जगदंबा देवस्थान केळापूर, खेतानी फाउंडेशन, तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्था, पोलीस प्रशासन, शिक्षण विभाग आणि प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी यांनी दिलेल्या सहकार्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
🎯 सामाजिक कार्याला नवी दिशा
राजकीय चौकटीपलीकडे जाऊन पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांना एका व्यासपीठावर आणत समाजातील संवेदनशील प्रश्नांवर जनजागृती करण्याचा युवा टायगर फोर्सचा हा उपक्रम पांढरकवड्याच्या सामाजिक क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरला आहे.
दहा हजारांहून अधिक पालक-विद्यार्थ्यांचा सहभाग, प्रा. वसंत हंकारे यांचे प्रभावी प्रबोधन आणि पालक-विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतून उमटलेल्या भावनांमुळे ‘न समजलेले आई-बाप’ महासंवाद पांढरकवड्याच्या सामाजिक व शैक्षणिक इतिहासातील एक ठळक आणि अविस्मरणीय पर्व ठरला.











